मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 13:19 IST2025-09-04T13:08:54+5:302025-09-04T13:19:31+5:30
Panchak September 2025: यंदा २०२५ ची अनंत चतुर्दशी आणि खग्रास चंद्रग्रहण मृत्यू पंचकात असणार आहे.

मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
Panchak September 2025: चातुर्मास सुरू आहे. गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. भाद्रपद पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. हे खग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे. परंतु, अनंत चतुर्दशी आणि खग्रास चंद्रग्रहणावेळी मृत्यू पंचक लागणार आहे. मृत्यू पंचक म्हणजे काय? नेमकी कोणती कामे किंवा गोष्टी या काळात करू नये? जाणून घेऊया...
ज्योतिषात ग्रह-नक्षत्रांचा अधिक विचार केला जातो. पंचांगाचे तिथी, वार, योग, ग्रह-नक्षत्र, मुहूर्त, करण मुख्य भाग असून, यामधील पंचक काल सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो. पंचक लागण्याची वेळ, मुहूर्त शास्त्रात अत्यंत महत्त्वपूर्ण मानला गेला आहे. पंचक कालावधीत शक्यतो शुभ कार्य केले जात नाही. पंचक कालावधी हा अमंगलाचे सूचक मानला गेला आहे. पुराणातील काही उल्लेखांनुसार, रामायण काळात श्रीरामांनी रावणाचा वध केला, तेव्हा पंचक लागले होते. पंचक काळात कोणाचा मृत्यू झाला असेल, तर ते अशुभ मानले जाते.
मृत्यू पंचक म्हणजे काय?
ज्योतिषशास्त्रानसार, पाच नक्षत्रांच्या विशिष्ट कालावधीला पंचक म्हटले जाते. चंद्राचे धनिष्ठा नक्षत्राचे तृतीय चरण आणि शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, रेवती या नक्षत्रांमधील भ्रमण कालावधीला पंचक मानले जाते. काही मान्यतांनुसार, या काळात केलेल्या अशुभ कार्यांचा पाचपट प्रभाव पडत असतो. खगोल विज्ञानाच्या दृष्टिकोनातून ३६० अंशाच्या भचक्रात पृथ्वीच्या ३०० डिग्री ते ३६० डिग्री मध्य भ्रमणाच्या कालावधीला पंचक मानले जाते. शनिवारी पंचक सुरू झाले तर त्याला मृत्यू पंचक असे म्हटले जाते. शनिवार, ०६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.२२ वाजेपासून पंचक सुरू होत आहे. बुधवार, १० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ०४.०३ वाजता पंचक समाप्त होणार आहे. मृत्यू पंचक अतिशय कष्टदायी, प्रतिकूल मानले जाते. पंचक कालावधीत चंद्राचा पृथ्वीवर सर्वाधिक प्रभाव असल्याचे मानले जाते.
मृत्यू पंचक काळात काय करू नये?
- पंचक सर्व कार्यांसाठी अशुभ नसते, तर काही कार्यांसाठी पंचक अत्यंत शुभ मानले जाते. या कालावधीत यात्रा करणे, मुंडन कार्य, व्यापार आदी कार्यांसाठी पंचक शुभ मानले गेले आहे. तसेच साखरपुडा समारोह, विवाह आदी शुभ कार्ये पंचक कालावधीत केली जाऊ शकतात.
- परंतु, सप्टेंबर महिन्यात लागणाऱ्या पंचक कालावधीत चंद्रग्रहण आणि पितृपक्ष सुरू होत आहे.
- पंचक कालावधीत काही कार्ये करणे निषिद्ध मानले गेले आहे. पंचक कालावधीत लाकडाची खरेदी करू नये. घराच्या छताच्या दुरुस्तीचे किंवा नवीन बांधकाम करू नये. पंचक काळात दक्षिण दिशेकडे प्रवास करणे वर्जित मानले गेले आहे. कोणात्याही प्रकारच्या इंधनाचे भंडारण करू नये, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
- पंचक कालावधीत जुळून येणाऱ्या शुभ योगांवर केलेल्या काही कार्यांचा सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतो. काहीवेळा धनलाभाचे योगही प्रबळ होऊ शकतात. याशिवाय वाहन खरेदी, गृह प्रवेश, शांती पूजन, मालमत्तेशी संबंधित स्थिर कार्ये करणे पंच कालावधीत शुभ मानली गेली आहेत.
- पंचक काळात मृत्यू होणे शुभ मानले जात नाही. पंचक कालावधीत मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, आप्तेष्ट यांच्या जीवितहानीची शक्यता असते. पंचक दोष लागू नये, यासाठी काही उपाय शास्त्रात सांगितले गेले आहेत.
- पंचक कालावधीत कोणाचा मृत्यू झाला, तर ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्याचे अंतिम संस्कार करताना दर्भाचे एक प्रतीक तयार करून त्याचा दाहसंस्कार मृतकासोबत करण्याचे विधान आहे, असे सांगितले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.