Gauri Pujan 2025: मुखवट्याच्या गौरी सोडून खड्यांच्या गौरी पूजण्याचे काय आहे कारण? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 15:15 IST2025-08-30T15:14:01+5:302025-08-30T15:15:47+5:30

Gauri Pujan 2025: अनेक घरांमध्ये खड्याच्या गौरी पूजल्या जातात, त्यामागे कारण काय आणि शास्त्र काय ते जाणून घेऊ.

Gauri Pujan 2025: What is the reason for worshipping Gauri made of stones instead of Gauri made of masks? Read | Gauri Pujan 2025: मुखवट्याच्या गौरी सोडून खड्यांच्या गौरी पूजण्याचे काय आहे कारण? वाचा

Gauri Pujan 2025: मुखवट्याच्या गौरी सोडून खड्यांच्या गौरी पूजण्याचे काय आहे कारण? वाचा

>> मकरंद करंदीकर  

गणपती बाप्पा आले, म्हणजे त्यांची आई गौरीही(Gauri Avahan 2025) येणार. मुळातच हा सण म्हणजे काळ्या आईकडून निर्माण होऊ घातलेल्या समृद्धीच्या शुभारंभाचा काळ ! पिके तयार होऊ लागलेली असतात. भाज्या, फळे, फुले, विविध उपयुक्त वनस्पती यांची रेलचेल झालेली असते. पाऊस झाल्यामुळे सर्वत्र चिखल झालेला असतो. या भिजलेल्या मातीतून जन्माष्टमीला बाळकृष्ण, पोळ्याला बैल, हरतालिकेला  मूर्ती बनविल्या जात असत. त्याचप्रमाणे गणपतीची मूर्ती साकारून तिची पूजा करणे म्हणजे भूमातेचा शुभंकर सुपुत्र अवतरल्यासारखे असते. या प्रथम पूजनीय गणपतीनंतर त्याच्या आईचा म्हणजे गौरींचा मान! 

Gauri Avahan 2025: गौरी आवाहनापासून विसर्जनापर्यंत सविस्तर माहिती; पूजा साहित्य आणि मुहूर्तही!

हा गौरींचा उत्सव तसेच पूजा, विविध नैवेद्य या सर्व गोष्टी या वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातात. हा सृजनाचा उत्सव असल्याने तो साहजिकच स्त्रियांच्या अधिकारात येतो. विविध ठिकाणी ज्येष्ठा कनिष्ठा गौरी या मुखवटे, उभ्या मूर्ती, भिंतीवरील चित्र, तेरड्याच्या रोपट्याला देवीचे चित्र लावून, कलश इत्यादी स्वरूपात पुजल्या जातात. 

कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये मात्र देवीचे प्रतीकात्मक रूप म्हणून ७ खडे आणून पुजले जातात. या संबंधात केले जाणारे विविध विनोदही ऐकायला मिळतात. पण याची थोडी पार्श्वभूमी जाणून घेऊ या. कोकणामध्ये पावसाचे प्रमाण खूप असते. सगळीकडचे जलसाठे तुडुंब भरलेले असतात. असे जलसाठे हे पावसाळ्यानंतरच्या काळात सर्वाधिक धोकादायक असतात. फोफावलेल्या वनस्पती, वेली, निसरडी जमीन, सर्वत्र चिखल यामुळे अपघात आणि मृत्यूची भीती असते. अपरिचित जलसाठ्यांच्या ठिकाणी, तिन्ही सांजेला उजेड कमी होताना, खूप झाडीच्या ठिकाणी कांहींचा अनपेक्षित अपमृत्यु ओढवतो. अत्यंत पुढारलेल्या अशा आजच्या काळातही पावसाळ्यात नदीत, ओढ्यात, धबधब्यात, समुद्रात बुडून मरण्याचे प्रमाण वाढते. मग यातून भीतीची, दंतकथांची परंपरा सुरु होते. कांही कथा तर खूपच भीतीदायक आहेत. अशा ठिकाणी पूर्वी अपघातात मरण पावलेल्या कांही स्त्रियांची पिशाच्चे येथे वास करतात असे मानले गेल्याने आणखीनच भीतीदायक पार्श्वभूमी लाभते.  त्यांच्या कथा अनेक पिढ्यांपर्यंत सांगितल्या जात राहतात. त्यामुळे विविध प्रकारचे विधी, तोडगे हे भक्तिभावाऐवजी भीतीमुळे केले जातात. 

मोक्षदायी अशी सप्त तीर्थे, सप्त मातृका, सात पवित्र नद्या तशी आपल्याकडे सप्त देवतांची कल्पना मांडलेली आणि मानलेली आहे. विहिरी, तळी, सरोवर, पाणवठे अशा ठिकाणी सात देवतांचे वास्तव्य मानलेले आहे. त्यांना सात जल योगिनी, जलदेवता, अप्सरा म्हणतात. त्याचे साती आसरा, सती आसरा असे अपभ्रंशही झाले. गोंड समाजात त्यांना गुरुकन्या मानले जाते.  मत्सी, कूर्मी, कर्कटी, दर्दुरी, जतुपी, सोमपा, मकरी अशी त्यांची नावे आहेत. ही सर्व नावे जलचरांची आहेत. त्यांना त्रास दिल्यामुळे, नीट सेवा न केल्यामुळे त्यांचा कोप होतो. म्हणून त्या माणसांना ओढून पाण्यामध्ये नेतात अशी लोकांची श्रद्धा आहे. तसा कोप  होऊ नये म्हणून प्रतीकात्मक ७ खडे आणून त्यांची पूजा केली जाते. 

हे खडे जल साठ्याजवळून, वाहत्या पाण्यातून, पवित्र वृक्षतळ अशा ठिकाणांहून आणले जातात. त्यांना समृद्धी देणाऱ्या, रक्षणकर्त्या सप्त देवता मानून त्यांची भक्तिभावाने सेवा केली जाते. गौरींच्या परंपरागत कहाणीमध्ये, दारिद्र्यामुळे तळ्यात जीव द्यायला निघालेल्या गरीब ब्राह्मणाला, वृद्ध स्त्रीचे रूप घेतलेल्या गौरी देवीने वाचविले व त्याला समृद्धी दिली, असे वर्णन आहे. 

कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये या सप्त देवतांचे, ७ खड्यांच्या रूपात पूजन करण्याचे व्रत पाळले जाते. कोकणात अनेक सुप्रसिद्ध मंदिरातील देवता या सप्त शिळांच्या रूपात आढळतात. त्यामुळे सप्त शिळांचे महत्व केवळ ब्राह्मणच नाही तर अन्य अनेक समाजांमध्ये आहे. त्यांच्या त्या कुलदेवताही आहेत.  

आनंदाच्या सणासुदीच्या काळात ( म्हणजे सध्याच्या पावसाळ्यात ) माणसाने आपण देवापेक्षाही ( निसर्गापेक्षाही ) शक्तिवान, बुद्धिवान आहोत असे समजून आपला जीव घालविण्यापेक्षा, त्याचा सन्मान राखावा हेच या  ७ खड्यांच्या गौरींच्या कहाणीचे फलित आहे.   

Web Title: Gauri Pujan 2025: What is the reason for worshipping Gauri made of stones instead of Gauri made of masks? Read

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.