माजलगावातील सराफा व्यापाऱ्याला एकट्यात गाठले; शस्त्राचा धाक दाखवत ६० लाखांचे दागिने पळवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2026 14:33 IST2026-01-25T14:32:51+5:302026-01-25T14:33:56+5:30
भरदिवसा घडलेल्या घनटेने शहरातील सर्व सराफा व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण!

माजलगावातील सराफा व्यापाऱ्याला एकट्यात गाठले; शस्त्राचा धाक दाखवत ६० लाखांचे दागिने पळवले
माजलगाव: शहरातील अनेक सराफा व्यापारी गावोगावी जाऊन सोन्या-चांदीचे दागिने विकण्याचे काम करतात. अशाच एका सराफा व्यापाऱ्याकडून आज(दि.२५) भर दिवसा शस्त्राचा धाक दाखवत ६० लाख रुपयांचे दागिने पळवल्याची घटना घडली आली आहे. या घनटेने शहरातील सर्व सराफा व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटना कशी घडली?
शहरातील हनुमान चौक येथे अमोल पंढरीनाथ गायके यांचे अमोल ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. ते नेहमी आपल्या बाईकवरुन विविध गावांमध्ये जाऊन सोन्या-चांदीच्या दागिन्यांची विक्री करत असतात. आज सकाळी ९ वाजता ते घरातून निघाल्यानंतर, साडेनऊच्या सुमारास तालखेड फाटा परिसरात पोहोचले. तेथून पुढे खेर्डा गावाकडे जात असताना, त्यांच्या पाठीमागून एका चारचाकी वाहनातून अज्ञात चोरट्यांनी पाठलाग सुरू केला.
शस्त्राचा धाक दाखवून लूट
रस्त्यावर कोणीही नसल्याची संधी साधत चोरट्यांनी व्यापाऱ्याच्या बाईकसमोर आपले वाहन आडवे लावले. त्यानंतर त्यांनी दागिन्यांची बॅग देण्याची मागणी केली. व्यापाऱ्याने नकार दिल्यानंतर, चोरट्यांनी कोयता, गज यांसारखी शस्त्रे दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर व्यापाऱ्याच्या हातातील दागिन्यांची बॅग हिसकावून आरोपी घटनास्थळावरून तत्काळ पलायन झाले.
किती दागिने लुटले?
मिळालेल्या माहितीनुसार, गायके यांच्याकडून ३५० ग्रॅम सोन्याचे विविध दागिने (अंदाजे किंमत: ₹५० लाख) आणि ३ किलो चांदीचे विविध दागिने (अंदाजे किंमत: ₹१० लाख), असा एकूण सुमारे ६० लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती काही क्षणांतच माजलगाव शहरात वाऱ्यासारखी पसरली. माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसेच, तात्काळ आजूबाजूच्या पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, बीड येथील एलसीबी पथकानेही घटनास्थळी भेट देत तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
व्यापारी व नागरिकांमध्ये भीती, रोष
या घटनेनंतर माजलगाव शहर व परिसरातील सराफा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरी व दरोड्याच्या घटना वाढत असल्याने, नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत नाराजी व्यक्त केली जात असून, कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.