'आमचा पराभव नवनीत राणा यांनी केला'; अमरावतीमधील भाजपाच्या २२ उमेदवारांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिले पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 21:51 IST2026-01-17T21:16:04+5:302026-01-17T21:51:40+5:30
अमरावती महानगरपालिकेचे निकाल समोर आले, या निकालामध्ये भाजपाचा मोठा पराभव झाला. दरम्यान, आता पराभूत उमेदवारांनी नवनीत राणा यांच्याविरोधात आरोप केले आहेत.

'आमचा पराभव नवनीत राणा यांनी केला'; अमरावतीमधील भाजपाच्या २२ उमेदवारांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिले पत्र
राज्यातील २९ महानगरपालिकांचे निकाल काल समोर आले. राज्यात भाजपाला मोठे यश मिळाले आहे. पण, अमरावतीमध्ये भाजपाचा मोठा पराभव झाल्याचे पाहालयला मिळाले. दरम्यान, आता या पराभवावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपाच्या २२ पराभूत उमेदवारांनी नवनीत राणा यांच्याविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे, नवनीत राणा यांना निष्कसित करा अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.
'निवडणुकी काळातील शेवटच्या पाच दिवसांमध्ये नवनीत राणा यांनी भाजपाच्या विरोधात प्रचार केल्याचा आरोप उमेदवारांनी केला. नवनीत राणा यांनी भाजपाचे उमेदवार डमी आणि युवा स्वाभिमानचे उमेदवार हेच खरे भाजपाचे उमेदवार असा आक्रमक प्रचार केला असल्याची तक्रार या पत्रात उमेदवारांनी केली.
दरम्यान, यावर नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "मी कोणालाही उत्तर देण्यासाठी काम करत नाही मी भाजपसाठी काम करते. कोणी काही टीका केली तरी ते मंचावर येऊनच बोलू शकतात. कोणी टीका केली ते समोर बोलले नाहीत, माझ्या पाठीमागे बोलले आहेत, पाठीमागे कोणीही टीका करते म्हणून मी त्या दिवशी म्हटलं तिळगुळ घ्या आणि पाठीमागे गोड गोड बोला, असे राणा म्हणाल्या.
जरी युवा स्वाभिमान वेगळी लढली तरी आमची यारी पक्की आहे आणि मैत्री ही पक्की आहे. जे लोक बोलतात ते सोडून द्यावे लागते आपल्याला कामावर लक्ष करावे लागते, असंही नवनीत राणा म्हणाल्या.