मंत्र्यांचे जाकीट टाईटफिट, जनावरांना मात्र चारा नाही : संग्राम जगताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 14:20 IST2019-04-11T14:14:35+5:302019-04-11T14:20:17+5:30
भाजप सरकारच्या काळात पशुधन धोक्यात आले आहे़ सरकार मात्र छावण्या सुरू केल्याचा देखावा करीत आहे़ राज्याचा कारभार चालविणाऱ्या मंत्र्यांचे जॅकेट टाईटफिट आहे, तर मुक्या जनावरांना मात्र मोजून चारा, असा सरकारचा अजब कारभार आहे,

मंत्र्यांचे जाकीट टाईटफिट, जनावरांना मात्र चारा नाही : संग्राम जगताप
जवळे : भाजप सरकारच्या काळात पशुधन धोक्यात आले आहे़ सरकार मात्र छावण्या सुरू केल्याचा देखावा करीत आहे़ राज्याचा कारभार चालविणाऱ्या मंत्र्यांचे जॅकेट टाईटफिट आहे, तर मुक्या जनावरांना मात्र मोजून चारा, असा सरकारचा अजब कारभार आहे, अशी टीका अहमदनगर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांनी पारनेर तालुक्यातील जवळे येथील सभेत केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल अध्यक्षस्थानी होते. यावेळी ज्येष्ठ नेते दादाकळमकर, जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, निलेश लंके, ज्येष्ठ नेते मधुकर उचाळे, घनश्याम शेलार, माधवराव लामखडे, अशोक सावंत, दादासाहेब दरेकर, सुभाष लोंढे, सुवर्णा घाडगे, बबन रासकर, अंजना रासकर आदी उपस्थित होते़ जगताप यांनी यावेळी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला़ ते म्हणाले, पारनेर बालेकिल्ला असल्याचे काही जण सांगत आहेत़ या भागातील मतदारांच्या मतांवर वर्षानुवर्षे सत्ता भोगली़ मात्र या भागासाठी योगदान काय? निवडणुका आल्या की तालुक्यांचे दौरे करायचे़ या भागातील प्रश्न सोडवू, अशी आश्वासने द्यायची़ निवडणुका संपल्यानंतर पुढच्या निवडणुकीला त्यांना तालुक्याची आठवण येते़ विरोधकांची भूमिका मतलबी असून, अशा भूलथापा मारणाऱ्यांना थारा देऊ नका. पारनेर तालुका त्यांना चमत्कार दाखवेल, असे जगताप म्हणाले.
मी दक्षिणेतील असल्याने विखेंनी विरोध केला
राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी विखे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, मी दक्षिणेतील रहिवासी असल्याने साई संस्थानच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी विरोध केला़ दक्षिणेला तेथे संधी दिली नाही. त्यांचे पुत्र आता दक्षिणेतून निवडणूक लढवित आहेत़ प्रवरानगरचे सुटाबुटातील अधिकारी, कर्मचारी प्रचाराला तुमच्याकडे येतील़ त्यांना फक्त एवढेच विचारा की, गेल्या चार- सहा महिन्यात तुमचे पगार झाले का? यंत्रणेचा भपका दाखविणारे कर्मचाऱ्यांचे पगार करतील का हे सांगावे?