Lok Sabha Election 2019 : या आहेत... मतदान न चुकविणा-या आजीबाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 15:54 IST2019-04-02T15:54:21+5:302019-04-02T15:54:28+5:30
इंग्रजांचे राज्य होते, ते गेले अन मतदानाची संधी मिळाली़ ग्रामपंचायती पासून ते लोकसभेपर्यंत सर्व निवडणुकीत मतदान करता आले़ नेमके कोणत्या साली मतदान केले हे मात्र आठवत नाही, असे उद्गार आहेत ९० वर्षीय भागुबाई येवले यांचे़

Lok Sabha Election 2019 : या आहेत... मतदान न चुकविणा-या आजीबाई
राहुरी : इंग्रजांचे राज्य होते, ते गेले अन मतदानाची संधी मिळाली़ ग्रामपंचायती पासून ते लोकसभेपर्यंत सर्व निवडणुकीत मतदान करता आले़ नेमके कोणत्या साली मतदान केले हे मात्र आठवत नाही, असे उद्गार आहेत ९० वर्षीय भागुबाई येवले यांचे़
कुठल्याही शाळेत न गेलेल्या भागुबाई येवले यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीबरोबरच राहुरी ग्रामपंचायत, राहुरी कारखाना, सहकारी सोसायट्या आदी ठिकाणी न चुकता मतदान केले आहे़ महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, डॉ़. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलही येवले यांना ऐकून माहिती आहे़ मतदान केल्यानंतर जास्त मत मिळविणारा निवडून येतो व कमी मत मिळविणारा पडतो एवढीच माहिती त्यांना आहे.
पूर्वीच्या काळी मतदान करणे हे प्रतिष्ठेचे समजले जात होते़ चित्रावर फुली मारायची एवढे कामही धाडसाचे वाटायचे़ शिक्क्याची जागा मतदान यंत्राने घेतली़ मतदान करता येईल का नाही याची खात्री नव्हती़ परंतु चित्रापुढे बटन दाबून मतदान करता आले़ आवाज आला की मतदान झाले हे अधिकाऱ्यांनी सांगितलेला शब्द आठवतो़ मग आपण समजायचे की आपले मतदान बरोबर झाले़ दिवसेंदिवस मतदान करणे वयोमानानुसार अवघड वाटते़ यंदाही मतदान करणार असल्याचे भागुबाई येवले यांनी सांगितले़ अलीकडील काळात मतदानाचे पैसे वाटले जातात याबाबत विचारले असता, मत हे दान करायचे असते़ पैसे न घेता मतदान केले पाहिजे़ त्यामुळे चांगली माणसे निवडून येतील़ मतदानाचे कधीही पैसे घेतले नसल्याचे भागुबाई येवले यांनी सांगितले़
महापूर आला अन् मोसंबीची जागा उसाने घेतली
राहुरीची मोसंबी परदेशात प्रसिध्द होती़ इंग्रजांना राहुरीची मोसंबी खूप आवडायची़ ते गाडीत बसून मोसंबी तोडायला यायचे़ त्यांना बघितले की शेतकरी घराचे दरवाजे बंद करून बसायचे़ इंग्रजांना कुणीही शेतकरी विरोध करीत नसे़ १९४६ मध्ये मुळा नदीला महापूर आला व राहुरी वाहून गेले़ त्यानंतर मोसंबीची जागा उसाने घेतली़, अशी आठवणही येवले यांनी सांगितली.