अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी 'दादा'
By अण्णा नवथर | Updated: January 17, 2026 13:36 IST2026-01-17T13:36:02+5:302026-01-17T13:36:37+5:30
युती फिफ्टीप्लस : राष्ट्रवादी महापौरपदाच्या स्पर्धेत; शिंदेसेनेला दहा जागा, मविआला धक्का

अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी 'दादा'
अहिल्यानगर : राज्यात राष्ट्रवादीला (अजित पवार) एकाही महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळविता आलेले नाही. एकमेव अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक २७ जागा जिंकून राष्ट्रवादी (अजित पवार) महापौरपदाच्या स्पर्धेत आली आहे. महापौरपद राष्ट्रवादीला मिळणार की भाजप या पदावर दावा सांगणार ही राजकीय चर्चा निकालानंतर सुरू झाली आहे.
येथील महापालिकेत एकूण ६८ नगरसेवक आहेत. त्यात राष्ट्रवादीचे २७ व भाजपचे २५ मिळून ५२ संख्याबळ झाले आहे. या दोन्ही पक्षांची निवडणूकपूर्व युती असल्याने ते सत्ता स्थापन करतील. महायुतीत ज्यांच्या जागा जास्त त्यांचा महापौर असा संकेत असतो. त्यामुळे राष्ट्रवादी महापौर पदावर दावा सांगेल, अशी चर्चा आहे. राज्यात पुणे, पिंपरीचिंचवडसह अनेक ठिकाणी अजित पवार गटाला यश मिळविता आले नाही. केवळ अहिल्यानगरमध्ये त्यांना महापौरपद मिळू शकते, असे चित्र आहे.
महापौरपदाचे आरक्षण अद्याप निघालेले नाही. त्यामुळे आरक्षण निघाल्यानंतर याबाबतच्या घडामोडींना गती येईल. शिंदेसेनेचे १० नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र, शिंदेसेना स्वतंत्र लढली. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी शिंदेसेनेला दूरच ठेवण्याची शक्यता आहे. जर या दोन्ही पक्षांत काही बोलणी फिस्कटली तर ऐनवेळी शिंदेसेनाही सत्तेच्या राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जाते. राष्ट्रवादीला (शरद पवार) महापालिकेत भोपळाही फोडता आला नाही. काँग्रेसला केवळ दोन जागा जिंकता आल्या. उद्धवसेनेने एक जागा मिळवली आहे. एमआयएमने दोन व बसपने एक जागा मिळवली आहे. त्यामुळे या पक्षांचा सत्तेत प्रवेश होण्याची अजिबातही शक्यता दिसत नाही.
मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केले अभिनंदन
महापालिका निवडणूक निकालाचे आकडे हाती आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना फोन करून अभिनंदन केले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या विजयाचे श्रेय आमदार संग्राम जगताप व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना दिले.
शिंदेसेना, काँग्रेसच्या शहराध्यक्षांचा पराभव
शिंदेसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे हे रिंगणात होते. त्यांचा पराभव झाला. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण हेही निवडणूक मैदानात होते. त्यांना मतदारांनी धक्का दिला आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांनाच या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. महाविकास आघाडीतील घटक पक्षांना दोनचा टप्पाही पार करता आला नाही.