विकास शहा
शिराळा (जि. सांगली) : एकीकडे आपत्ती व्यवस्थापनाची तयारी सुरू असताना कृष्णा व भीमा नदी खोऱ्यातील पर्जन्यमापक यंत्रणा ११ जूनपासून कोलमडली आहे.
स्वयंचलित ५२ यंत्रे बंद असल्यामुळे पडणारा पाऊस, धरणातील पाणीसाठा, नदीचीपाणीपातळी याची माहितीच उपलब्ध होणार नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कसे करणार, असा प्रश्न पडला आहे.
ही यंत्रणा चालविण्याचा पाच वर्षांचा करार ११ जूनला संपला आहे. मंत्रालयातून नवीन कराराला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे ही यंत्रणा असून कुचकामी ठरली आहे.
आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी पडणाऱ्या पावसाची नोंद व धरणातील पाणीसाठा याच्या गणितावर पाणी सोडण्याची यंत्रणा कार्यरत असते. पूर्वी शासकीय पातळीवर कर्मचारी वर्गामार्फत नोंदी घेतल्या जात होत्या. मात्र, त्यास मर्यादा येत होत्या.
आता स्वयंचलित यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. सॅटेलाइटद्वारे सकाळी ८ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ८ अशी चोवीस तासांतील माहिती संकलित केली जाते.
ही यंत्रणा चालविण्यासाठी ऑपरेटर, अधिकारी आदींसाठी कंपनीबरोबर पाच वर्षांचा करार केला जातो. तो आता संपला आहे.
२३ ठिकाणी यंत्रणा बंद
कृष्णा नदी खोऱ्यात ५९ व भीमा नदी खोऱ्यात ७५ स्वयंचलित पर्जन्यमापन यंत्रे बसविण्यात आली आहेत. कृष्णा खोऱ्यातील २३ यंत्रे मंगळवारपर्यंत बंद पडली आहेत.
पाथरपुंज महत्त्वाचे ठिकाण
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंज हे केंद्र पावसाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. कारण यापूर्वी येथे चेरापुंजीपेक्षाही जास्त पाऊस पडला होता. १ जून २०२४ ते ३१ मे २०२५ या कालावधीत चेरापुंजीपेक्षा फक्त ६५० मिलीमीटर पाऊस कमी होता.
स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रणा चालविण्याबाबत असणारा पाच वर्षांचा करार ११ जून रोजी संपला आहे. जुन्या कराराला मुदतवाढीसाठीचा तसेच नवीन टेंडर मंजुरीसाठी असे दोन प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आले आहेत त्यामुळे लवकरच ही यंत्रणा सुरू होईल. - मयूरा जोशी, कार्यकारी अभियंता जलविज्ञान विभाग, सांगली
अधिक वाचा: पीएम किसानचा २० वा हप्ता लवकरच खात्यावर जमा होणार; यादीत तुमचे नाव कसे चेक कराल?