पुढील तीन दिवस राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस पडेल, असा इशारा हवामान खाल्याने दिला असतानाच रविवारी महाराष्ट्रात उष्मा वाढल्याचे चित्र होते.
सांगली जिल्ह्यात गारांचा पाऊस पडला. रविवारी देशातील सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमान अकोला व वर्धा शहरात नोंदविले गेले.
विदर्भातील सर्वच शहरांचा पारा ४१ अंशांवर गेला असून, नागपूर, अमरावती शहरांचे तापमानही ४४ अंशापेक्षा जास्त नोंदविण्यात आले.
कोकणात ढगाळ, तर मराठवाड्यात अवकाळी
◼️ विदर्भ, खानदेशच्या तुलनेत मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळी पावसाचे प्रमाण अधिक असेल.
◼️ कोकणात अवकाळी पावसाची शक्यता कमी आहे. तिथे ढगाळ हवामान राहील.
◼️ हवामान खात्याने सोमवारी, मंगळवारी आणि बुधवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली आहे.
◼️ दुपारी चार नंतर बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता अधिक आहे.
विदर्भात यलो अलर्ट
◼️ विदर्भात पुढच्या दोन दिवसांसाठी हवामान खात्याने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
◼️ काही ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पारा ४० अंशांच्या वर
◼️ विदर्भासह मराठवाड्यातील सर्व प्रमुख शहरांचेही तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे.
◼️ तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या शहरांचे तापमान ४० ते ४३ अंशांपर्यंत गेले आहे.
गारांसह वादळी पावसाने झोडपले
दिवसभराच्या कडक उकाड्यानंतर रविवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने मिरज, तासगाव तालुक्यासह सांगली, मिरज आणि कुपवाड या शहरांना अक्षरशः झोडपून काढले. गारांसह कोसळलेल्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते.
अधिक वाचा: बदललेल्या शक्तीपीठ महामार्गामुळे 'या' ३४ गावांतील जमिनीच्या किमतीत दुपटीने वाढ; एकरी काय दर?
