पंढरपूर : शक्तीपीठ महामार्गाची दिशा बदलल्यानंतर हा मार्ग आता बार्शी, माढा, पंढरपूर, माळशिरस तालुक्यातून सातारा जिल्ह्यात जात आहे. त्यामुळे हा मार्ग ज्या गावातून, ज्या गटातून गेला आहे.
त्या गटातील जमिनींना वाढीव मोबदला मिळेल, या अपेक्षेने जमिनी खरेदी करण्यासाठी जिरायत, बागायत पट्टयात दलालांची मोठी टोळी सक्रिय झाली आहे.
त्यामुळे महामार्गाच्या परिसरातील जमिनींच्या किमती दुपटीने वाढल्या आहेत. एकतर महामार्गासाठी जमिनी द्यायच्या नाहीत, दिल्या तर त्या विकायच्या नाहीत, या पवित्र्यात शेतकरी आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील ३४ गावांमधून हा नवीन प्रस्तावीत शक्तीपीठ महामार्ग जात आहे. यामध्ये बार्शी, माढा, पंढरपूर व माळशिरस या तालुक्यातील खालील गावांचा समावेश आहे.
◼️ बार्शी तालुका: मेडशिंगी, रुईवर, वऱ्हाडी, बेगडा, सुरडी, गौडगाव, नरेगाव, रुई, मालेगाव, मुंगशी, रातंजन, सर्जापूर, वैराग, मुक्ताई वॉटर पार्क, ढोराळे, सावळी, धानोरे.
◼️ माढा तालुका: मानेगाव, चव्हाणवाडी, वाकाव, केवळ, खैरेवाडी, विठ्ठलवाडी, उपळाई खुर्द, उपळाई बुद्रुक, रोपळे, वडाचीवाडी, सोलंकरवाडी, बावी, मोडनिंब, अरण, तुळशी.
◼️ पंढरपूर तालुका: करकंब-व्यवहारे वस्ती, नेमतवाडी, बादलकोट, पेहे, आवे, नांदोरे, भीमा नदीवर पूल.
◼️ माळशिरस तालुका: नेवरे, जांभूड, विठ्ठलवाडी, माळखांबी, उघडेवाडी, वेळापूर, मजरेवाडी, घुमेरा ओढ्यावरील पूल, निमगाव, गारवाड, चांदापुरी.
यामधील काही गावे वगळता जवळपास सर्वच गावातील बागायती क्षेत्र असल्यामुळे महामार्गासाठी जमिनी देण्यास शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध दर्शविला आहे. बागायती जमिनी जाणार असल्यामुळे भविष्यात उपासमारीची वेळ येईल, अशी भीती शेतकऱ्यांमधून होत आहे.
झाडे, बोअर, घर बांधणीसाठी धडपड
◼️ घर, बोअर, विहीर याचेही स्वतंत्र मूल्यांकन करून त्याची नुकसानभरपाई दिली जाण्याची चर्चा आहे.
◼️ त्यामुळे रिकाम्या जमिनीतही रातोरात आंबा, डाळिंब, द्राक्ष, चिकू आदी फळबागांची झाडे लावली जात आहेत.
◼️ बोअर, विहीर, तात्पुरती घरेही उभारली जात आहेत.
◼️ धडपड करूनही लावलेली झाडे उन्हाळा असल्यामुळे जमिनीचे मूल्यांकन होईपर्यंत जगविणे.
◼️ शेतकरी, दलालांसमोर आव्हान असणार आहे. एवढे करूनही त्याचा खरेच मोबदला मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे.
२५ एप्रिलनंतर मूल्यांकन
◼️ प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाचा गुगल नकाशा शेतकऱ्यांकडे उपलब्ध असला तरी प्रत्यक्ष तो कोणत्या शेतकऱ्यांच्या शेतातून जाणार, याबाबत शेतकरी अनभिज्ञ आहेत.
◼️ २५ एप्रिलनंतर जमिनीच्या मुल्यांकन, गट निश्चितीला सुरुवात होणार असून, त्यानंतरच कोणत्या शेतकऱ्यांचे किती क्षेत्र बाधीत होणार, त्यांना भरपाई कशा पद्धतीने मिळणार, हे स्पष्ट होईल.
द्राक्ष, डाळिंब, केळी जाणार
◼️ पंढरपूर तालुक्यातील सहा, माढा तालुक्यातील नऊ, माळशिरस तालुक्यातील अकरा गावांमधून मार्ग जाणार आहे.
◼️ तो भाग जवळपास द्राक्ष, डाळिंब, केळी, उसासह फळबागा असणारा भाग आहे.
◼️ त्यामुळे या जमिनी देण्यास शेतकऱ्यांची हरकत आहे.
◼️ तरीही दलालांची टोळी काही गरजू शेतकऱ्यांचा शोध घेऊन जमिनी घेण्यासाठी प्रयत्नशील होती.
◼️ मात्र, आता याविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती झाली असून, शेतकरी जमिनी विकण्यास तयार नसल्याची परिस्थिती आहे.
बागायतीला दर एकरी ६० लाखांपर्यंत
◼️ माढा, पंढरपूर परिसरात यापूर्वी बागायती जमिनीला ३० ते ४० लाखांचा, तर जिरायती जमिनींना १० ते २० लाख एकरापर्यंत सरासरी भाव होता.
◼️ मात्र, आता प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे बागायती जमिनींचे भाव ५० ते ६० लाख रुपयांवर गेले आहेत.
◼️ जिरायत जमिनींच्या ३० लाखांपेक्षा अधिक किमती सांगितल्या जात आहेत.
◼️ या किमतीनाही काहीजण खरेदीसाठी तयार असले तरी शेतकरी मात्र विक्रीसाठी धजावत नसल्याचे चित्र आहे.
अधिक वाचा: पीकविमा योजनेतून पहिल्या टप्प्यातील नुकसान भरपाई जाहीर; 'या' शेतकऱ्यांना मिळणार लाभ
