आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर परिसरात असणाऱ्या पाटण खोऱ्यासाठी वरदान ठरलेल्या डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र हे चालू वर्षी झपाट्याने रिकामे झाले आहे.
या परिसरातील आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दि. २४ एप्रिल रोजी डिंभे धरणाचापाणीसाठा हा १७.७७ टक्के एवढा शिल्लक राहिला आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पाटण खोऱ्यासाठी वरदान ठरलेल्या डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र हे यावर्षी या भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे या खोऱ्यांमध्ये मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे तुटुंब भरून वाहत होते.
यामुळे परिसरातील पाटण म्हाळुंगे, कुशिरे खु, कुशिरे बु, मेघोली, दिगद, बैंढारवाडी ही गावे ओलिताखाली येऊन या भागातील आदिवासी शेतकरी हा उपसा सिंचनाद्वारे मोठ्या प्रमाणात रब्बी पिके घेऊ लागला.
या पाणलोट क्षेत्रातून पाणी उपसा करुन बाजरी गहू, बटाटे, कांदे, मेथी, कोथिंबीर यासारखी पिके मोठ्या प्रमाणात घेऊ लागला. परंतु जसजशी उन्हाळ्याची तीव्रता वाढली गेली तसतशी डिंभे धरणातील पाणीपातळी कमी होऊ लागली आहे. यावर्षी लवकरच डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र रिकामे झाले आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे परिसर मुसळधार पावसाचे माहेरघर समजले जाते, पावसाळ्यात चार महिने या भागात राहणाऱ्या जनतेला सूर्य व चंद्राचे दर्शनही घडत नाही.
चार महिने मुसळधार पाऊस पडूनही उन्हाळ्यामध्ये या भागातील आदिवासी जनतेला पाण्यासाठी वणवण करावी लागते. वर्षानुवर्षे या भागातील आदिवासी बांधवांना दुष्काळाचे हाल सोसावे लागतात.
या भागातील विहिरी, शिवकालीन खडकातील टाक्या, बुडीत बंधारे, तळी, डव्हरी इत्यादी उपलब्ध असणारे जलस्त्रोत पावसाळ्यात तुडुंब भरतात. परंतु उन्हाळ्यामध्ये या जलस्त्रोतांमध्ये पाण्याचा थेंबही राहिला नाही. पाण्यासाठी या भागातील आदिवासी बांधवांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत.
गतवर्षपिक्षा चालू वर्षी पावसाने लवकरच काढता पाय घेतला, त्याचप्रमाणे डिंभे धरणातून वारंवार पूर्व भागासाठी कालव्याने मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात असल्यामुळे डिंभे धरणातील पाणीसाठा १७.७७ टक्के एवढाच शिल्लक राहिला आहे.
झऱ्यातून पाणी वाटीने टिपावे लागते
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पाटण खोऱ्यात असणाऱ्या सावरली, पिंपरी साकेरी, नानवडे, ढकेवाडी, मेघोली बेंढारवाडी या गावांच्या अत्यंत हाकेच्या अंतरावर डिंभे धरण असून, आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण करत दुष्काळाचे हाल सोसावे लागत आहेत. या गावांना मोठ्या प्रमाणात दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र व याचा धरणाचा फुगवटा या गावांच्या उशाला असूनही या गावांतील आदिवासी बांधवांना वाटीने झन्यातून पाणी टिपावे लागत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात जसजसा उन्हाळा जाणवू लागला आहे तसतशा दुष्काळाच्या झळा या भागातील आदिवासी जनतेला सोसाव्या लागत आहेत.
बंधारे बांधून पाणी अडविले
पावसाळ्यात मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे म्हाळुंगे-कुशिरे दरम्यान असणारा डिंभे धरणाच्या मागील बाजूस असणारा फुगवटा हा मोठ्या प्रमाणात भरला जातो, त्याचप्रमाणे या पाणलोट क्षेत्रात पाटण पिंपरी व पिंपरी म्हाळुंगे हद्दीमध्ये छोट्या छोट्या कोल्हापुरी पद्धतीने बंधारे बांधून पाणी अडविले जात आहे व त्या कोल्हापूरी पद्धतीच्या बंधाऱ्यातून उपसा सिंचन करुन या भागामध्ये बागायत पद्धतीची शेती केली जात होती.
अधिक वाचा: पुण्यातली नोकरी सोडली आणि केशर आंब्याची शेती केली; वर्षाला ५ लाख रुपयांची कमाई झाली