राजेंद्र गावित यांचा दणदणीत विजय; बविआला भोवले ‘सूर्याचे’ पाणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 12:09 AM2019-05-24T00:09:11+5:302019-05-24T00:11:14+5:30

जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांनी दिली गावितांना साथ

Victory of Rajendra Gavit; Bavia in trouble in 'Surya' water? | राजेंद्र गावित यांचा दणदणीत विजय; बविआला भोवले ‘सूर्याचे’ पाणी?

राजेंद्र गावित यांचा दणदणीत विजय; बविआला भोवले ‘सूर्याचे’ पाणी?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क । पालघर : या लोकसभा मतदार संघातील विजयी उमेदवार राजेंद्र गावित यांचा विजय हा सेना-भाजपच्या झालेल्या युतीमुळे व तिला श्रमजीवीने दिलेल्या पाठिंब्यामुळे तसेच बविआच्या ऐनवेळी हरपलेल्या शिट्टीमुळे घडून आला आहे. त्याचप्रमाणे बविआच्या असलेल्या अंगभूत मर्यादा आणि ८६ हजार नवमतदारांचा हातभारही त्याला लागला आहे. गावित यांनी जाधव यांचा ८४,६०० मतांनी पराभव केला.


वर्षभरापूर्वी झालेल्या पोटनिवडणूकीत ही गोष्ट स्पष्ट झाली होती की, शिवसेना आणि भाजप हे एकजूटीने लढले तर त्यांचा विजय सहज घडून येतो परंतु ते स्वतंत्रपणे लढले तर विजय त्यातल्या एकाचा किंवा रिंगणात असलेल्या तुल्यबळ उमेदवाराचा होतो. गेल्या पोटनिवडणूकीत सेना-भाजपची युती नव्हती उलट ते प्राणपणाने एकमेकाला पराभूत करण्यासाठी ते एकमेकांवर तुटून पडले होते. त्यावेळी सेना आणि भाजपला जेवढी मते पडली होती. त्यांच्या बेरजेच्या जवळपास पोहोचतील एवढी मते यावेळी महायुतीचे विजयी उमेदवार गावितांना मिळालेली आहेत. त्यामध्ये जो फरक दिसतो आहे तो श्रमजीवीच्या पाठिंब्याची मते आणि यावेळी नव्याने नोंदविले गेलेले ८६ हजार मतदार यांच्यामुळे दिसतो आहे.


बहुजन विकास आघाडी हा या मतदारसंघातील एक प्रबळ घटक आहे. परंतु तो कमकुवत करण्यासाठी तिच्या विरोधकांनी तिचे गेल्या दोन दशकांपासून लोकप्रिय असलेली शिट्टी ही निशाणी निवडणुकीपूर्वी काढून घेतली जाईल किंवा ती गोठविली जाईल. अशी खेळी पडद्या आडून खेळली. त्याचा फटका तिला बसला. त्याचप्रमाणे वसई, नालासोपारा, विरार, बोईसर या चार महानगरांपलिकडे बविआला स्वीकारार्हता नाही हा आजवरचा अनुभव होता आणि झालेले मतदान नेमके याच पट्ट्यात तुलनात्मकदृष्ट्या कमी झालेले होते. याचाही फटका बविआला बसला यामुळे बळीराम जाधव यांचा पराभव घडून आला. नेमके काय घडेल? याचा अंदाज बविआच्या श्रेष्ठींनाही मतमोजणीपूर्वीच आला होता. त्यामुळे कालपासून बविआच्या गोटात आणि कार्यालयात सर्वत्र सामसूम दिसत होती. या मतदारसंघात स्थानिक हितसंबंधांचे अंर्तविरोध आहेत.

सूर्या प्रकल्पाचे पाणी पालघर तालुका व परिसरासाठी वापरावे असा जनतेचा आग्रह आहे. तर बविआ वसई-विरार महापालिकेत सत्तेवर असल्याने हे पाणी वसई-विरारसाठी व लगतच्या परिसरासाठी वापरावे ही बविआची भूमिका आहे. या पाणीवाटप मुद्यावरून प्रचंड घमासान झाले आहे. बंदही पाळले गेले आहेत. कृतीसमितीही स्थापन झाली आहे. त्यातूनच जे आमच्या हक्काचे सूर्याप्रकल्पाचे पाणी वसई-विरारसाठी वळवून नेतात, तेच सत्ता प्राप्त करण्यासाठी आमची मते मागतात. त्यांना आम्ही ती का द्यावी? या प्रश्नाचे उत्तर बविआला अजून देता आले नाही. त्यामुळेच बविआचा प्रभाव बोईसरच्या पुढे जाऊ शकत नाही. अशी स्थिती आहे , याही मुद्याचा परिणाम गावित यांच्या विजयावर झालेला आहे.

मित्रपक्षांनी ‘पुरेसा जोर लावला नाही’
वाडा/पारोळ : या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात वसई, नालासोपारा, बोईसर येथे बविआ तर डहाणू, विक्रमगड येथे भाजप, पालघर येथे शिवसेना अशी आमदारकी आहे म्हणजे ६ पैकी ३ विधानसभा मतदारसंघात युतीची सत्ता आहे. त्यादृष्टीनेही बविआ आणि महायुती यांचे बलाबल समान होते. महायुतीला जशी श्रमजिवीने साथ दिली त्याचप्रमाणे बविआला काँग्रेस, राष्टÑवादी आणि अन्य धर्मनिरपेक्ष पक्षांनी साथ दिली होती. त्यात डावेही होते. त्यामुळे यावेळी तिच्या विजयाच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. परंतु मित्रपक्ष पुरेशा ताकदीने कामाला न लागल्याने व त्यांच्या सहकार्याचा अपेक्षित जो लाभ मतपेटीत पडायला पाहिजे होता. तो पडला नाही, त्यामुळेही जाधव यांचा पराभव घडून आला. आधी पोटनिवडणूक नंतर सार्वत्रिक निवडणूक अशा दोन निवडणुका लागोपाठ (पान ३वर)

तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली ‘नोटा’ला
पालघर : पालघर लोकसभेच्या मतदानात १२ उमेदवारातील विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार वगळता इतर १० उमेदवारामध्ये सर्वात जास्त मते नोटा (२९ हजार ४७९) ला मिळाली आहेत. येत्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी सर्वच उमेदवारांना याचा गंभीरपणे विचार करण्याचा जणू इशाराच आहे. पालघर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र गावित, बविआचे बळीराम जाधव, बहुजन समाज पार्टी चे संजय तांबडा, आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया चे देवराम कुरकुटे, मार्क्ससीस्ट लेनिनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (रेड फ्लॅग) चे शंकर बदादे, वंचित बहुजन आघाडीचे सुरेश पाडवी, बहुजन मुक्ती पार्टीचे संजय कोहकेरा, तर अपक्ष दत्ताराम करबट, ताई भोंडवे, राजू लडे, विष्णू पाडवी आणि स्वप्नील कोळी असे १२ उमेदवार रिंगणात होते.जिल्ह्यात बुलेट ट्रेन, एक्सप्रेस वे, एमएमआरडीए, प्रारूप विकास आराखडा, वाढवण बंदर, जिंदाल जेट्टी, सीझेडएमपी, सीआरझेड मधील बदल, सागरी महामार्ग,शिपिंग कॉरिडॉर, वसई-नवघर-अलिबाग कॉरिडॉर आदी स्थानिकांना उध्वस्त करणारे प्रकल्प लादण्यात आले होते. त्यानंतर आरोग्याचे प्रश्न,सुसज्ज रुग्णालय नसल्याने गुजरात,सिल्वासा आदी परराज्यात जाऊन करावे लागणारे उपचार,स्थानिकांना डावलून पर जिल्ह्यातील उमेदवारांना इथल्या शासकीय कार्यालयात मिळणारे स्थान, प्रदूषणाची वाढती व्याप्ती,त्या अनुषंगाने कॅन्सर सारख्या रुग्णांची वाढती संख्या, रोजगाराची कमतरता, मच्छीमारांचे प्रश्न प्रश्न इथल्या मतदारांना सतावीत होते. मात्र त्यांच्या समस्यांची उकल समाधानकारक रित्या होत नसल्यानेच मतदारांनी नोटा चा वापर केला असावा असा कयास व्यक्त केला जात होता.

 

हा पराभव खिलाडूपणे मान्य करतो
हा पराभव आम्ही खिलाडूपणे मान्य करतो, याला सर्वस्वी मी जबाबदार असून मतदारांनी स्थानिक प्रश्न व त्याची सोडवणूक नेमकं कोण करत आला आहे याचा विचार न करता थेट सुनामीला मतदान केलं. तरीही झाल्या पराभवाला मोठ्या मनानं स्विकारतो.

- हितेंद्र ठाकूर, अध्यक्ष बविआ

राज्यमंत्री असताना थोडा कमी कालावधी मिळाला असला तरी प्रत्येक घटकातील जनतेला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. २०१८ च्या पोटनिवडणुकीत खासदारपदी निवडून आल्यावर कमी कालावधी मिळाला असला तरी प्रत्यक्ष येथील जनतेच्या विकासासाठी प्रत्येक गावोगावी खेडोपाडी फिरून समस्यांचा आढावा घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न केला - राजेंद्र गावित, विजयी खासदार


उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
१० उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाले आहे. एकूण मतदान वाढल्याने डिपॉझिट वाचविण्यासाठीची मतेही वाढली होती

Web Title: Victory of Rajendra Gavit; Bavia in trouble in 'Surya' water?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :palghar-pcपालघर