१५६ अपक्ष मैदानात; कोणाला फायदा, कोणाचे गणित बिघडणार? मतांचे विभाजन होणे अटळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 17:12 IST2026-01-11T17:12:04+5:302026-01-11T17:12:04+5:30
याचा फायदा कोणाला होणार आणि फटका कोणाला बसणार हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

१५६ अपक्ष मैदानात; कोणाला फायदा, कोणाचे गणित बिघडणार? मतांचे विभाजन होणे अटळ
मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा : वसई विरार महापालिकेत २९ प्रभागांतील ११५ जागांसाठी ५४७उमेदवार रिंगणात असून, यापैकी ३८६ उमेदवार हे विविध राजकीय पक्षांचे आहे, तर त्यांना टक्कर देण्यासाठी १५६ अपक्ष उमेदवारही सज्ज आहेत. या अपक्षांमध्ये उमेदवारी न मिळालेले काही राजकीय पक्षाचे बंडखोर उमेदवारही आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतील अपक्ष यांच्यामुळे मताचे विभाजन होणार हे तर निश्चित आहे. मात्र, याचा फायदा कोणाला होणार आणि फटका कोणाला बसणार हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.
अनेक पक्षांतील नाराज अपक्ष म्हणून रिंगणात
सुमारे १० वर्षांनी वसई-विरार पालिकेची निवडणूक होत आहे. निवडणुकीत आपल्या पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मागील चार ते पाच वर्षांपासून विशिष्ट वॉर्डात काम करीत होते. मात्र, यंदा मोठ्या प्रमाणात झालेल्या पक्षांतराने अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फिरले.
वसई विरार मनपा निवडणुकीतही प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलून आयारामांना किंवा इतरांना संधी दिल्याने अनेक नाराजांनी बंडाचा झेंडा फडकवीत निवडणुकीत आव्हान उभे केले आहे.
एकच अपक्ष नगरसेवक
यापूर्वीचे महापालिकेतील पक्षीय बलाबल पाहता एकच अपक्ष उमेदवार देवयानी धुमाळ या निवडून आल्या होत्या.
मतांचे विभाजन होणे अटळ
विकास आघाडी, उद्धवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित निवडणुकीच्या २९ प्रभागांतून भाजप, शिंदेसेना, बहुजन पवार), वंचित, बसप, सप, एमआयएम, आप व इतर छोट्यामोठ्या पक्षांसह अपक्ष उमेदवारांची लढत होणार आहे.
अस्तित्वाच्या लढाईत अपक्ष उमेदवार मागे राहिलेले नाहीत. अनेक ठिकाणी अटीतटीच्या लढती होण्याची शक्यता असून, या लढतीत अपक्ष उमेदवारांमुळे निकालाची गणिते बिघडण्याची शक्यता आहे.
राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांसमोर अनेक पक्षातील बंडखोरांनी अपक्ष म्हणून दंड थोपटल्याने मत विभाजनाचा धोका वाढला आहे. यामुळे प्रत्येक प्रभागात आता अपक्षांच्याही प्रचाराने वेग घेतला आहे.
काही अपक्षांनी, तर राजकीय पक्षाच्या उमेदवारांनाही घाम फोडला आहे, त्यामुळे १५६ अपक्षांपैकी कितीजण विजयाचा गुलाल उधळतात, हे निकालातूनच स्पष्ट होणार आहे.