जिल्ह्यातील अनाथ मुलांच्या 'बालसंगोपन' निधीला वर्षापासून 'ब्रेक'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 18:13 IST2025-03-29T18:12:25+5:302025-03-29T18:13:04+5:30
जिल्ह्यात सव्वा चार हजार लाभार्थी : २५ टक्के लाभार्थ्यांना मिळाला केवळ चार महिन्यांचा निधी

The 'childcare' fund for orphans in the district has been put on hold since last year.
चेतन बेले
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पालकत्व गमावलेल्या बालकांसाठी बालसंगोपन योजना राबविली जात आहे. या योजनेचे जिल्ह्यात सव्वा चार हजार लाभार्थी आहेत. यापैकी केवळ २५ टक्के लाभार्थ्यांना चार महिन्यांचा निधी मिळाला आहे. उर्वरित ७५ टक्के लाभार्थ्यांना गेल्या वर्षभरापासून शासनाकडून मिळणारी अनुदानाची रक्कम मिळाली नसल्याने योजना कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे.
बेघर, निराश्रित व अन्य गरजू बालकांना संस्थेत दाखल करून घेण्याऐवजी कौटुंबीक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास होण्यास संधी उपलब्ध व्हावी, हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत महिला व बालविकास विभागाने राज्यात बालसंगोपन योजना सुरू केली. या योजनेच्या नावात बदल करून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना असे करण्यात आले आहे. शिवाय अनुदानात दुप्पट वाढ करण्यात आली. यात त्या बालकास अल्प व दीर्घ कालावधीसाठी पर्यायी कुटुंबात संगोपनासाठी निधी देण्यात येतो. एका कुटुंबात दोनपेक्षा जास्त मुले ठेवता येत नाहीत. बहुतेक प्रकरणात संबंधित लाभार्थी मुलांची जबाबदारी नातेवाइकांकडे दिली जाते.
अनुदानात वाढ झाल्याने लाभार्थी संख्येत वाढ
बालसंगोपन योजनेंतर्गत १८ वर्षांखालील वयोगटातील मुलांना संस्थाबाह्य संगोपन थेट पर्यायी कुटुंब उपलब्ध संगोपन केले जाते. पालनकर्त्या पालकास महिन्याकाठी पूर्वी १ हजार २०० रुपये देण्यात येत होते. यात शासनाने बदल करून अनुदान दुप्पट केले आहे. आता २ हजार २०० रुपये प्रतिलाभार्थी देण्यात येत असल्याने लाभार्थ्यांची संख्याही वाढतीवर असल्याचे सांगण्यात आले आहे.
जूनपासून अनुदान रखडले
जुन महिन्यापासून योजनेचे अनुदान थकले आहे. पूर्वी विभागाच्या खात्यावर योजनेचा निधी येत होता. त्यानंतर हा निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर वळता करण्यात येत होता. मात्र, नव्याने काढण्यात आलेल्या जीआरमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी तत्त्वावर थेट निधी जमा करण्यात येत असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.
२,९६० लाभार्थ्यांना वर्षभरापासून प्रतीक्षा
गतवर्षी एप्रिल, मे, जून २०२४ या तीन महिन्यांचा १ हजार ३२० रुपये निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी पद्धतीने जमा करण्यात आला आहे. उर्वरित २ हजार ९६० लाभार्थ्यांना गत वर्षभरापासून निधीसाठी प्रतीक्षा लागली आहे. लाभार्थ्यांची यादी आयुक्तालयाकडे पाठविण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १,३२० लाभार्थ्यांच्या खात्यावर ४ महिन्यांचा निधी जमा केला. टप्प्याटप्प्यात ही प्रक्रिया सुरू असून, लवकरच उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी वळता केला जाणार आहे. लहान वयातच खडतर अनुभवाचा सामना करावा लागणाऱ्या बालकांसाठी ही योजना खऱ्या अर्थाने नवसंजीवनी देणारी आहे.
१३० बालकांच्या अनुदानाला मिळणार थांबा
योजनेत १८ वर्षापर्यंत बालकांना योजनेचा लाभ दिला जातो. १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या जिल्ह्यात १३०च्या घरात आहे. या लाभार्थ्यांच्या अनुदानाला थांबा दिला जाणार आहे.