वर्ध्यातील विद्यार्थी जाणार इस्रोच्या दारी, शेतकऱ्यांना घडणार दुबईवारी !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 18:44 IST2025-06-24T18:44:15+5:302025-06-24T18:44:52+5:30
Wardha : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केलीय घोषणा: जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेतला आढावा, अधिकाऱ्यांना दिल्याय कामाच्या सूचना

Students from Wardha will go to ISRO, farmers will have a Dubai experience!
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बालकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, याकरिता जिल्ह्यात दरवर्षी तालुका व जिल्हास्तरावर विज्ञान प्रदर्शनी आयोजित केली जाते. यामध्ये जिल्हास्तरावर यशस्वी झालेल्या ५१ बालवैज्ञानिकांची निवड करून त्यांना बंगळूर येथील इस्रो केंद्रामध्ये तर प्रत्येक तालुक्यातील २१ विद्यार्थ्यांना नागपुरातील रमण विज्ञान केंद्रात पाठविण्याचे तसेच वायगाव (हळद्या) येथील शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञान अवगत व्हावे, याकरिता त्यांना दुबईला पाठविण्याचे नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी मागील वर्षातील सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेचा झालेला खर्च, या आर्थिक वर्षातील या तीनही योजनेतून मे महिन्याअखेरपर्यंत झालेला खर्चाचा आढावा घेतला. बैठकीला खासदार अमर काळे, आमदार दादाराव केचे, आमदार समीर कुणावार, आमदार सुमित वानखेडे, आमदार राजेश बकाने, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलिस अधीक्षक अनुराग जैन, उपवनसंरक्षक हरवीर सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजूरवार यांच्यासह सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून विविध विभागांना निधी दिला जातो. हा निधी कोणत्याही परिस्थितीत शासनास परत न जाता शंभर टक्के खर्च झाला पाहिजे. या योजनेतून कामे करतांना गुणवत्तापूर्वक करा. विकासाची चांगली कामे करून जिल्ह्याचे नाव लौकिक कसे करता येतील, यासाठी विभागांनी प्रयत्न करावे, तसेच अधिकाऱ्यांनी कामे करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केल्या.
सर्व आमदारांनी वेधले विविध मुद्द्यांवर लक्ष
रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधांची उपलब्धता, शिक्षकांची रिक्त पदे, शाळा, अंगणवाडी बांधकाम व सुरक्षा भिंत, स्मशानभूमीस जाणारे रस्ते, ग्रामसडक योजनेची अपूर्ण कामे, घरकुल लाभार्थ्यांना पट्टधांचे वाटप व मोजणी, सुरक्षा कुंपणासाठी जंगलालगतच्या गावांचा समावेश, हातपंप दुरुस्ती, मागील वर्षातील प्रलंबित कामे, सेवाग्राम पाणीपुरवठा योजनेचे वाढीव काम, जलजीवन मिशनची कामांना गती, आर्वी शहरातील नागरिकांना मालमत्ता पत्रक, वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना, आर्वी येथे शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा बसविणे, बँकांकडून अनुदानाची परस्पर कपात, आर्वी शहरातील अंडरग्राऊंड ड्रेनेज, जळालेल्या रुग्णांवर उपचार अशा सूचनांचा समावेश आहे. या सूचनांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
मैदान स्वच्छ होईपर्यंत कंत्राटदारांची देयके थांबवा
वर्धा जिल्ह्याचे ठिकाण आहे, त्यामुळे साहजिकच शहरातील विविध मैदानांवर वर्षभर विविध कार्यक्रम होत असतात. कार्यक्रमानंतर मैदान पूर्णपणे स्वच्छ, नीटनेटके व पूर्वीप्रमाणे होणे आवश्यक आहे. तसे होत नसल्याने मैदानांवर सराव करणारे खेळाडू तसेच नागरिकांना त्रास सहन करावा नागतो. सध्या सर्व मैदानांवरील स्वच्छता व नीटनेटकेपणाची कामे झाली नसेल तर त्वरित करून घ्या, तोवर संबंधित कंत्राटदारांचे देयके थांबवा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
सोयाबीन बियाण्याची तातडीने चौकशी करा
जिल्ह्यात वरुण नावाचे सोयाबीनचे बियाणे विकले जात आहे. हे बियाणे गुणवत्तेचे नसल्याची बाब आमदार राजेश बकाने यांनी बैठकीत मांडली. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावे लागणार असल्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने या बियाण्यांचा किती साठा जिल्ह्यात आहे, हे तपासून बियाण्यांची तत्काळ चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले.
४१२ कोटी ७० लाखांचा निधी यावर्षीकरिता मंजूर
यावर्षी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेत ३५० कोटी, अनुसूचित जाती उपयोजना ४४ कोटी तर आदिवासी उपयोजनेत १८ कोटी ७० लाख असे ४१२ कोटी ७० लाख रुपये मंजूर आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.