दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात मध्य प्रदेशातूनही येते दारूची 'खेप'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:39 IST2025-06-12T13:37:21+5:302025-06-12T13:39:09+5:30
गांधी - विनोबांच्या कर्मभूमीत दारूबंदीचा 'बार' ठरला फुसका

Liquor 'consignments' are also coming from Madhya Pradesh to Wardha district, where liquor is banned.
रवींद्र चांदेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या कर्मभूमीत दारूबंदीचा 'बार' फुसका ठरला आहे. दारूबंदी नावालाच उरली असून, वर्धा जिल्ह्यात थेट मध्य प्रदेशातून दारूची 'खेप' जिल्ह्यात येत आहे. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सेवाग्रामला आश्रम तयार करून तेथे वास्तव्य केले. याच आश्रमातून अनेक चळवळींचा जन्म झाला. आचार्य विनोबा भावे यांनी पवनार येथे आश्रम स्थापन करून भुदान चळवळ राबविली. परिणामी, वर्धा जिल्ह्याला देशात वेगळी ओळख प्राप्त झाली. त्यामुळेच शासनाने १९७४ पासून जिल्ह्यात दारूबंदी घोषित केली. त्याला आता ५१ वर्षे लोटली आहेत. मात्र, ही दारूबंदी फसवी निघाल्याचे दिसून येत आहे. शासनाने महसूल वाढीसाठी राज्यात दारू विक्रीचे परवाने दिले. बीअर शॉपींना परवानगी दिली. सध्या राज्यात जवळपास २० हजारांच्यावर परवानाधारक आहेत. यात रेस्टॉरंट, 'बार'चा समावेश आहे. याशिवाय अनेक जिल्ह्यांत गावठी हातभट्टीची दारूही गाळली जाते. पोलिसांच्या छाप्यांवरून ही बाब सिद्ध होते. वर्धा जिल्ह्यातही शेत, नदी, नाले, गाव, आदी ठिकाणी हातभट्ट्या पेटतात. जिल्ह्याशेजारील नागपूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, आदी जिल्ह्यांतून दारूची खेप जिल्ह्यात पोहोचते.
हॉटेलात दारू पिण्यास मनाईचे फलक
जिल्ह्यात येणारी दारू रोखण्याची पहिली जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागावर आहे. नंतर पोलिसांवर ही जबाबदारी येते. मात्र, त्यांच्या कारवाया नाममात्र असल्याचे दिसून येते. दारू विक्रेत्यांवर 'वर्दी'चा वचक दिसून येत नाही. 'वर्दी'तील काही चेहरेच दारूचे 'दर्दी' असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे जिल्ह्यात अनेक ठिकाणी केवळ एक फोन केल्यास दारू विक्रेते थेट घरपोच सेवा देतात. काही हॉटेलमध्ये तर दारूबंदी असतानाही चक्क 'येथे दारू पिण्यास मनाई आहे', असे फलक लागलेले दिसून येतात
खासदारांचे शाह यांना साकडे
५१ वर्षे उलटूनही दारूबंदी केवळ कागदावरच असून, जिल्ह्यात दारूबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, असे साकडे नुकतेच खासदार अमर काळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना घातले. खासदारांनी जिल्ह्यात पानटपरीपासून, घराघरांतून दारूविक्री केली जात असल्याचे त्यांना सांगितले.
पालकमंत्र्यांनीही वेधले लक्ष
जिल्ह्यात दारूबंदी प्रभावीपणे राबविण्यासाठी जप्त केलेल्या मुद्देमालाचे रासायनिक परीक्षण जलदगतीने व्हावे म्हणून जिल्ह्यात न्यायवैद्यक प्रयोगशाळा निर्माण करावी, अशी मागणी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
दहा वर्षांत ५० हजार आरोपी निर्दोष...
१० वर्षात २०१४ ते २०२४ पर्यंत जिल्ह्यात दारूबंदीचे ९३ हजार ५५४ गुन्हे दाखल करण्यात आले. ५१ हजार ३४० गुन्ह्यांचा निकाल लागला. ६७४ प्रकरणांत गुन्हा सिद्ध झाला. ५० हजार ६६६ गुन्ह्यांत आरोपी निर्दोष सुटले. यावरून दोषसिद्धीचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते.