कापसाच्या झाल्या वाती अन् सोयाबीनची झाली माती !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 16:56 IST2024-10-21T16:55:21+5:302024-10-21T16:56:21+5:30
परतीच्या पावसाने झोडपले : वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी तालुक्यांत नुकसान, नुकसानाचे पंचनामे करण्याच्या सूचना

Cotton and soybeans crops damaged due to heavy rainfall
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : परतीच्या पावसाने दिलेल्या तडाख्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वर्धा जिल्ह्यात परतीच्या पावसाने कापूस, सोयाबीनच्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड केली जाते, यावर्षी चांगला भाव मिळणार, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापसाचीही मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. मात्र, दोन्ही पिकांचे परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कापसाच्या वाती आणि सोयाबीनची माती अशीच काय ते शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची अवस्था आहे.
सुरुवातीला महागडी खत, बियाणं खरेदी करून शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत ओरदार झालेल्या पावसाने सुरुवातीपासूनच ही पिके पावसाच्या कचाट्यात आली, तरीही शेतकरी उभे राहिले. मात्र, आता सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात उभी असलेली सोयाबीन आणि कापलेल्या सोयाबीनच्या सुड्या भिजून गेल्या, तर अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे पाण्यातून सोयाबीन काढण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. वेचणीला आलेल्या कापसाचीही काही वेगळी अवस्था नसल्याचे चित्र आहे.
कापूस पाण्यामुळे भिजल्याने मोठ नुकसान होत आहे. शेतातून निघणाऱ्या या उत्पादनावर दिवाळी सणाचे आर्थिक गणित अवलंबून असते. मात्र, आता ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतातून उत्पादन निघणार नसल्याने दिवाळी तरी साजरी कशी करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.
पपई उन्मळून पडली, केळीच्या बागेचे नुकसान
भिडी : शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसासह गारपिटीने देवळी तालुक्यातील भिंडी, रत्नापूर, हुस्नापूर, वाफगांव, बाभुळगांव, काजळसरा, गणेशपूर, शिरपूर, कोल्हापूर, मलातपूर, खडाँ बोपापूर, शेंदापूर, वाटखेडा, रायपूर येथील शेतकयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आले. भिडी शिवारात बोराच्या आकाराची गारपीट झाली. कपाशीसह सोयाबीन, पपई, केळी पिकाला मोता फटका बसला. फळांची पडझड झाली, तर बागा उन्मळून पडल्या. दरम्यान माजी राज्यमंत्री व आमदार रणजीत कांबळे यांनी नुकसानग्रस्त परिसरात भेट देत पाहणी केली. तसेच विमा अधिकारांसह तह सौलदारांना तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशित केले.
आर्वी तालुक्यात सोयाबीन पाण्याखाली
आर्वी तालुक्यात शनिवारी झालेल्या परतीच्या पावसाने चांगलाच कहर केला. आर्वी तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतकयांच्या शेतात पाणी सिरले. नांदूर येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत जलमय होऊन सोयाबीन पाण्याखाली गेले. तसेच, लाडेगाव परिसरात सोयाबीनच्या गंज्या पाण्याखाली गेल्याचे धडधडीत वास्तव असून, मोठे नुकसान झाले आहे.