ठाण्यात मतदान केंद्राचा शोध आता एका क्लिकवर! ३३ प्रभागातून पालिका निवडणुकीत ६४२ उमेदवार रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 12:25 IST2026-01-08T12:25:22+5:302026-01-08T12:25:43+5:30
प्ले-स्टोअरवरून 'मताधिकार' मोबाइल अॅप डाउनलोड केल्यानंतर मतदारांना मतदार नोंदणीशी संबंधित सर्व माहिती सोप्या पद्धतीने मिळू शकते.

ठाण्यात मतदान केंद्राचा शोध आता एका क्लिकवर! ३३ प्रभागातून पालिका निवडणुकीत ६४२ उमेदवार रिंगणात
ठाणे : ठाणे पालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर, अचूक व अद्ययावत माहिती सहज उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने मताधिकार' मोबाइल अॅप प्रभावी आणि उपयुक्त माध्यम ठरत आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून मतदारांना घरबसल्या माहिती मिळावी, या उद्देशाने अॅप विकसित करण्यात आले आहे.
प्ले-स्टोअरवरून 'मताधिकार' मोबाइल अॅप डाउनलोड केल्यानंतर मतदारांना मतदार नोंदणीशी संबंधित सर्व माहिती सोप्या पद्धतीने मिळू शकते. अॅपमध्ये संबंधित पालिका, जिल्हा, विधानसभा अथवा प्रभाग यासारखे मूलभूत तपशील भरल्यानंतर मतदाराचे मतदान केंद्र, (मतदार ओळखपत्र) क्रमांक, मतदान केंद्राचा संपूर्ण पत्ता, मतदानाचा दिनांक व वेळ यासह आवश्यक माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे.
३३ प्रभागातून पालिका निवडणुकीत ६४२ उमेदवार रिंगणात
मतदारांना यापुढे कार्यालयीन फेऱ्या, मतदार यादी शोधण्याची धावपळ, माहितीअभावी होणारा गोंधळ टाळता येणार आहे. प्रथमच मतदान करणारे युवक, स्थलांतरित नागरिक, तसेच ज्यांना आपले मतदान केंद्र किंवा एपिक क्रमांक माहीत नाही, अशा मतदारांसाठी हे अॅप उपयुक्त ठरत आहे. उल्हासनगरमधील मतदारांची व्होटर स्लिपची प्रतीक्षा संपली
उल्हासनगर शहरातील मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्राची माहिती मिळणार आहे. पालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी हायटेक तंत्रज्ञानाचा यासाठी वापर केला आहे. आव्हाळे यांच्या हस्ते ऑनलाइन मतदार केंद्रांची माहिती देणाऱ्या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे मतदारांची व्होटर स्लिपची प्रतीक्षा संपली आहे.
या पोर्टलमध्ये मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राचा पत्ता आणि तेथे पोहोचण्यासाठी नकाशा उपलब्ध असून, मतदार यादीतील भाग क्रमांक, अनुक्रमांक आणि इतर वैयक्तिक माहिती तत्काळ पाहता येईल. तसेच निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे आणि प्रभागांची रचना सहज पाहता येणार आहे. अशा प्रकारची नावीन्यपूर्ण आणि तंत्रस्नेही संकल्पना राबविणारी उल्हासनगर पालिका ही राज्यातील पहिली पालिका ठरली आहे.