सोलापुरात पिण्याच्या पाण्यासाठी शॉक लागून जीव जाणं, हे तर लाजिरवाणं: असदुद्दीन ओवैसी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 16:07 IST2026-01-07T16:06:23+5:302026-01-07T16:07:02+5:30
ते पानगल हायस्कूल येथे झालेल्या उमेदवारांच्या प्रचारसभेत बोलत होते. ओवेसी म्हणाले, गुजरातमध्ये पेट्रोल ९४ रुपये लिटर मिळते, तर सोलापुरात ते १०४ रुपयांना का?

सोलापुरात पिण्याच्या पाण्यासाठी शॉक लागून जीव जाणं, हे तर लाजिरवाणं: असदुद्दीन ओवैसी
सोलापूर : शहरात आजही पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. पाणी कमी वेळ व कमी दाबाने येत असल्यामुळे नागरिकांना मोटार लावून पाणी उचलावे लागते आणि त्यात विजेचा शॉक लागून लोकांचा मृत्यू होत आहे. पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी लोकांचा जीव जात असणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे, अशी टीका एमआयएमचे नेते खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली.
ते पानगल हायस्कूल येथे झालेल्या उमेदवारांच्या प्रचारसभेत बोलत होते. ओवेसी म्हणाले, गुजरातमध्ये पेट्रोल ९४ रुपये लिटर मिळते, तर सोलापुरात ते १०४ रुपयांना का? १० रुपये महाग पेट्रोल का मिळते? फक्त २५० किमी अंतरावर असलेले पुणे इतके पुढे गेले, सोलापूर मागेच का राहिले? असा थेट सवाल त्यांनी केला.
महापालिकेकडे आलेल्या सुवर्णजयंती योजनेतील ४०० कोटी आणि अमृत योजनेतील १५० कोटी कुठे गेले? कोणाच्या खिशात गेले?
महानगरपालिकेचा तब्बल १३०० कोटींचा अर्थसंकल्प जातो कुठे? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी महापालिका कारभारावर जोरदार हल्ला चढवला. निवडणूक तिकिटाच्या वादातून रविवार पेठेतील तरुणाचा खून होणे ही सोलापूरसाठी अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे ते म्हणाले.
एमआयडीसीतील आगीत कामगारांचा जनावरांप्रमाणे मृत्यू झाला, त्यातील एकही जीव अग्निशामक दलाला वाचवता आला नाही; हे प्रशासनाचे मोठे अपयश. सभेदरम्यान फारूक शाब्दींचे नाव काढताच उपस्थितांमधून मोठ्याने आवाज केला जात होता. एका इच्छुक उमेदवाराने भाषण सुरू करताच भावनिक होत अश्रू ढाळले. त्यावर जनसमुदायातून शाब्दी शाब्दी... अशी घोषणाबाजी होऊ लागली. तेव्हा त्यावेळी ओवैसी यांनी व्यासपीठावरून हस्तक्षेप केला.
उमेदवाराला थांबवत त्यांनी माईकचा ताबा घेतला अन् म्हणाले, फारूक शाब्दी यांनी राजीनामा देण्यापूर्वी माझ्याशी एकदाही चर्चा केलेली नाही. निवडणुकीनंतर मी त्यांची भेट घेईन, पक्षात पुन्हा आणण्याचा प्रयत्न करीन. त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर केलेला नाही, असे आश्वासन देऊन त्यांनी जनसमुदायाला शांत केले. दरम्यान, ओवैसी यांचे सायंकाळी सोलापुरात आगमन झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जणू रॅलीच काढली.