Satara: फलटण तालुक्यातील जनताही आता म्हणते ‘राजे चले जाव..’; मंत्री जयकुमार गोरे यांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 16:13 IST2025-07-14T16:10:45+5:302025-07-14T16:13:01+5:30
..अन्यथा जेलमध्ये गेला असता

Satara: फलटण तालुक्यातील जनताही आता म्हणते ‘राजे चले जाव..’; मंत्री जयकुमार गोरे यांचा घणाघात
फलटण : स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधी यांना ‘सायमन, गो बॅक’ चळवळ उभी करावी लागली. तसे आता फलटण तालुक्यातील जनता म्हणतेय ‘राजे, चले जाव.’ जुलमी राजवटीचा नायनाट झाला आहे. जनतेने वेगाने परिवर्तनाची लाट आणली आहे, यामुळे रामराजेंनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असा घणाघात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला.
फलटण येथे रविवारी झालेल्या व्यापारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, अभिजीत नाईक-निंबाळकर, जयकुमार शिंदे, सुदामराव मांढरे, विश्वासराव भोसले, विलासराव नलावडे, फलटण तालुकाध्यक्ष अमित रनवरे, बापूराव शिंदे, बजरंग गावडे, रणजितसिंह भोसले उपस्थित होते.
मंत्री गोरे म्हणाले, विकासकामे करण्यासाठी कोणालाही बरोबर घेतले नाही. आम्ही नीरा देवधरसाठी संघर्ष केला, कोणीही वाईट चिंतून उपयोग नाही. कटकारस्थाने जास्त काळ टिकत नाहीत. मला तुरुंगात टाकताना त्यांना आसुरी आनंद होत होता. तो तात्पुरता होता. दारात पोलिस उभे राहिले तेव्हा कळले असेल की, हे वाचण्याच्या पात्रतेचे नाहीत. त्यांनी सर्वांचे पाय धरले. मी कोणाचीही मदत मागितली नाही.
माजी खासदार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर म्हणाले, फलटणच्या परिवर्तनात जयकुमार गोरे यांचा सिंहाचा वाटा आहे. ग्रामपंचायतीसाठी निधी दिला आहे, क्रीडासंकुलाला निधी दिला. १०० गावांत ग्रामीण भागातील रस्ते, १५६ गावांत निधी मिळाला आहे. जुलमी राजवट उद्ध्वस्त करण्यासाठी व्यापाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही.
..अन्यथा जेलमध्ये गेला असता
देवेंद्र फडणवीस व मी त्यांना माफ केले, म्हणून ते तुरुंगात जायचे राहिले. नाहीतर जेलमध्ये गेला असता. बारामतीचा पाय चाटण्याची सवय इथे आणली त्यांनी दिल्लीचा मांत्रिक गाठला. लढायचे असेल, तर लढाई मर्दाची लढा बायकांना पुढे करून कोण लढते का?, मालोजीराजे यांचे नाव सांगता अन् असे वागता, असे म्हणत मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजेंवर टीकास्त्र डागले.