Satara Politics: ..तर ३५ हजार मतांनी त्यांची रिक्षा पलटी केली नसती, शंभूराज यांचा पाटणकरांना टोला 

By नितीन काळेल | Updated: June 13, 2025 19:37 IST2025-06-13T19:36:58+5:302025-06-13T19:37:37+5:30

महायुती म्हणून लढू; पण, वरिष्ठ निर्णय घेतील..

Guardian Minister Shambhuraj Desai responded to Satyajitsinh Patankar's criticism | Satara Politics: ..तर ३५ हजार मतांनी त्यांची रिक्षा पलटी केली नसती, शंभूराज यांचा पाटणकरांना टोला 

Satara Politics: ..तर ३५ हजार मतांनी त्यांची रिक्षा पलटी केली नसती, शंभूराज यांचा पाटणकरांना टोला 

नितीन काळेल 

सातारा : १९९७ ला शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला तो आजही कायम आहे. पण, काॅंग्रेसमधून राष्ट्रवादी, नंतर अपक्ष, पुन्हा तुतारी आणि आता कमळ असा प्रवास करणाऱ्यांनी किती पक्ष बदलले ते पहावे. आम्ही गद्दारी केली असती तर ३५ हजार मतांनी त्यांची रिक्षा पलटी केली नसती, असा जोरदार टोला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांना लगावला.

सातारा येथील निवासस्थानी पालकमंत्री देसाई यांनी पत्रकारंशी संवाद साधला. यावेळी शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पाटण तालुक्यातील सत्यजितसिंह पाटणकर यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर त्यांनी पालकमंत्री देसाई यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. याला प्रत्युत्तर देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. पालकमंत्री देसाई म्हणाले, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, मी एकही शब्द बोललेलो नाही. त्यांनी माझा सुरत, गुवाहाटी गेले असा उल्लेख केला आहे. त्यांचे जसे विषय समोर येतील ते सर्व मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालणार आहे. त्यानंतर आवश्यकता वाटल्यास मी त्यांच्याविरोधात बोलेन. पण, त्यांनी काॅंग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष, तुतारी आणि कमळ असा प्रवास केला आहेच ना ? त्यांनी किती पक्ष बदललेत ते पहावे.

आपली कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे का ? असा प्रश्नही पत्रकारांनी पालकमंत्री देसाई यांना केला. यावर त्यांनी कोंडी कोण कोणाची करते यावर आता बोलणे योग्य नाही. पण, मुख्यमंत्री फडणवीस यांनी वेळ द्यावा. त्यांच्या कार्यालयाकडे वेळ मागितलेली आहे. त्यांच्याशी याबाबत बोलणार आहे, असे स्पष्ट केले.

महायुती म्हणून लढू; पण, वरिष्ठ निर्णय घेतील..

सत्यजितसिंह पाटणकर आणि आपणही महायुतीत आहात, त्यामुळे पाटणमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक एकत्र लढणार का ? असा प्रश्नही पत्रकारांनी पालकमंत्री देसाई यांना केला. यावर महायुती म्हणून निवडणूक लढवू. याबाबत राज्य समन्वयक समितीत प्राथमिक चर्चाही झाली आहे. पाटणमध्ये कसे लढायचे याचे निर्णय तीन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

Web Title: Guardian Minister Shambhuraj Desai responded to Satyajitsinh Patankar's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.