हल्ली केसांच्या वेगवेगळ्या समस्या खूप जास्त वाढलेल्या आहेत. काही जणांचे केस प्रचंड गळत आहेत, तर काही जणांच्या केसांना अजिबातच वाढ नाहीये. केस गळायला लागले किंवा केस वाढत नसले की सगळ्यात पहिले आपण भर देतो तो शाम्पू बदलण्यावर. लगेच वेगवेगळे शाम्पू आपण केसांवर ट्राय करून बघतो. पण त्याचा प्रत्येक वेळी परिणाम होतोच असं नाही. म्हणूनच या बाबतीत सेलिब्रिटी हेअर एक्सपर्ट जावेद हबीब यांनी सांगितलेली ही महत्त्वाची माहिती एकदा वाचायलाच हवी.
जावेद हबीब सांगतात की पूर्वी साबणाने केस धुतले जायचे. आजही कित्येक लोक असे आहेत जे साबण लावून केस धुतात. ज्या लोकांना शाम्पू परवडत नाही ते सर्रास अंगाचा साबण केसांसाठी वापरतात. पण तरीही त्यांचे केस गळतात किंवा पातळ आहेत असं नसतं. मुळात केसांचं गळणं किंवा केसांचं वाढणं हे तुमच्या शाम्पूवर अवलंबून नाहीच. शाम्पू हा फक्त तुमचा स्काल्प स्वच्छ करण्यासाठीचं एक माध्यम आहे. त्यामुळे महागडा असो किंवा स्वस्त असो कोणताही शाम्पू तुमचे केस वाढविण्यासाठी मदत करत नसतो.
जर केस गळणं कमी करायचं असेल तर तुमची डोक्याची त्वचा स्वच्छ हवी. काही लोक फक्त वरवर केसांना शाम्पू करतात. पण त्याने डोक्याच्या त्वचेला चिकटलेला मळ, घाण स्वच्छ होत नाही. याचा परिणाम केसांच्या मुळांवर होतो आणि केस गळण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे डोक्याच्या त्वचेला व्यवस्थित शाम्पू लावा. बोटाच्या टोकांनी डोक्याच्या त्वचेला घासा आणि तिचा मळ काढून ती स्वच्छ करा. यामुळे केसांच्या मुळाशी व्यवस्थित ऑक्सिजन पोहोचतो, रक्तप्रवाह चांगला होतो आणि केस गळण्याचे प्रमाण आपोआप कमी होते. केसांची चांगली वाढ व्हावी असं वाटत असेल तर आहाराकडे लक्ष द्या. स्काल्प स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष द्या.
