कोकणवासीयांचा परतीचा प्रवास होणार निर्विघ्न, रत्नागिरी जिल्ह्यातून किती जादा गाड्यांचे आरक्षण..वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 17:06 IST2025-09-02T17:05:51+5:302025-09-02T17:06:13+5:30
आजपासून परतीचा प्रवास सुरू

कोकणवासीयांचा परतीचा प्रवास होणार निर्विघ्न, रत्नागिरी जिल्ह्यातून किती जादा गाड्यांचे आरक्षण..वाचा
रत्नागिरी : जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येत असल्यामुळे २९३० जादा एसटी गाड्यातून कोकणवासीय जिल्ह्यात आले होते. सात दिवसांचा गणेशोत्सव उत्साहात साजरा करून मंगळवारी (दि. २ सप्टेंबर) गाैरी-गणपतींचे विसर्जन केल्यानंतर मुंबईला परतीच्या प्रवासासाठी निघणार आहेत. पहिल्याच दिवशी रत्नागिरी विभागातून २२१ जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यात एसटीच्या माध्यमातून कोकणवासीय मोठ्या संख्येने आले आहेत. गाैरी-गणपतीचे विसर्जन केल्यानंतर ते पुन्हा कामाच्या ठिकाणी परतीच्या प्रवासाला निघणार आहेत. रेल्वेसह, खासगी गाड्या उपलब्ध असल्या तरी एसटी गावामध्ये, वाडीपर्यंत येत असल्यामुळे, तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या तिकीट दरातील सवलतीमुळे एसटीतील प्रवासाचा पर्याय निवडला जात आहे. त्यानुसार ग्रुप बुकिंगसाठी ७८४ व जनरल बुकिंगच्या १३५५ मिळून एकूण २,१३९ गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून, अद्याप आरक्षण सुरू आहे.
अनंत चतुर्दशी दि. ६ रोजी असल्यामुळे दि. ७ सप्टेंबरपर्यंत जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. दि. २ ते दि. ७ सप्टेंबरपर्यंत प्रवाशांच्या मागणीनुसार जादा गाड्या सोडण्यात येणार असून, मागणीनुसार आणखी गाड्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मुंबईहून आलेल्या जादा गाड्या प्रत्येक आगारात थांबविण्यात आल्या असून, याच गाड्या परतीसाठी सोडण्यात येणार आहेत. मंगळवारपासून त्या मार्गस्थ होतील.
निर्विघ्न प्रवासासाठी सज्ज
कशेडी ते खारेपाटण या मार्गावर रत्नागिरी विभागातर्फे फिरते दुरुस्ती पथक, यांत्रिक कर्मचारी, ब्रेकउाऊन व्हॅन, देखभाल पथक, अल्कोटेट चाचणी पथक, मार्ग तपासणी पथक/दक्षता पथक कार्यरत राहणार आहे.
दैनंदिन १५० बसेस
रत्नागिरी विभागातून प्रवाशांच्या मागणीप्रमाणे नऊ आगारांतून जादा गाड्यांची उपलब्धता करण्यात आली आहे. याशिवाय दैनंदिन १५० गाड्याही सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी ऑनलाइन आरक्षण सुविधा व मागणीनुसार बसेसची उपलब्ध करण्यात येत आहे.
२-७ सप्टेंबर कालावधीत आरक्षित बसेस संख्या
दिनांक - बसेस संख्या
२ - २२१
३ - ११११
४ - ५९२
५ - १०४
६ - ५७
७ - ५४
एकूण - २१३९
गावी आलेल्या गणेशभक्तांसाठी ग्रुप बुकिंगही करता येणार आहे. ग्रुप बुकिंगमुळे एसटी बस थेट त्यांच्या गावातून सुटणार आहे. त्यामुळे या सुविधेचा लाभ घेणे फायदेशीर ठरणार आहे. प्रत्येक आगारात प्रवासी वाहतूक केंद्र उभे करून बुकिंग सुविधा उपलब्ध केली आहे. - प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक.