PMC Election Results 2026: घड्याळ की तुतारी? एकच चिन्ह असतं तर फायदा झाला असता; चाकणकर यांची कबुली
By किरण शिंदे | Updated: January 18, 2026 16:36 IST2026-01-18T16:33:58+5:302026-01-18T16:36:11+5:30
महापालिका निवडणुकीत पक्ष चिन्हांमुळे मतदारांचा गोंधळ उडाल्याचं मान्य करत त्या म्हणाल्या, “घड्याळ किंवा तुतारी एकच चिन्ह असतं तर नक्कीच फायदा झाला असता.

PMC Election Results 2026: घड्याळ की तुतारी? एकच चिन्ह असतं तर फायदा झाला असता; चाकणकर यांची कबुली
पुणे -पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया देत निकाल स्वीकारल्याचं स्पष्ट केलं आहे. निवडणुकीत हार-जीत ही लोकशाहीची प्रक्रिया असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांनी दिलेला कौल आम्ही खुल्या मनाने स्वीकारतो, असं त्या म्हणाल्या.. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात आज बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर बोलत असताना रूपाली चाकणकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “निवडणुका म्हटलं की हार-जीत असतेच. या निकालानंतर पक्ष आत्मचिंतन करेल. पुणेकरांनी दिलेला निर्णय आम्ही मान्य केला आहे,” असं चाकणकर यांनी स्पष्ट केलं.
ईव्हीएमवर आक्षेप घेण्यात आलेल्या घटनांबाबत बोलताना चाकणकर म्हणाल्या की, “EVM संदर्भात कुठलीही अधिकृत तक्रार आलेली नाही. मात्र काही ठिकाणी शाई पुसल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत संबंधित यंत्रणा चौकशी करतील. जनतेने जो कौल दिला आहे तो स्वीकारणं महत्त्वाचं आहे. हार-जीत खुल्या मनाने मान्य केली पाहिजे. पक्ष निश्चितच यावर विचार करेल. लोकशाही प्रक्रियेचा आदर राखणं गरजेचं आहे, असं मत चाकणकर यांनी व्यक्त केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रूपाली ठोंबरे यांचा पुणे महानगरपालिका निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर त्यांनी घातलेल्या गोंधळाबाबत विचारलेल्या प्रश्नावर चाकणकर यांनी
प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, आपण सगळे संविधान मानणारे आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. काही चुकीचं घडलं असेल तर न्यायालयात जाऊन दाद मागण्याचा अधिकार आहे,” असं त्या म्हणाल्या.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर चाकणकर म्हणाल्या, महापालिका निवडणुकीत पक्ष चिन्हांमुळे मतदारांचा गोंधळ उडाल्याचं मान्य करत त्या म्हणाल्या, “घड्याळ किंवा तुतारी एकच चिन्ह असतं तर नक्कीच फायदा झाला असता. अनेक ठिकाणी मतदार गोंधळलेले दिसले. पुढील निवडणुकांमध्ये, विशेषतः जिल्हा परिषद निवडणुकीत, एकाच चिन्हावर लढलो तर त्याचा फायदा होईल.”