PCMC Election Results 2026 : पिंपरी-चिंचवड महापालिकेत टक्का घसरला; फटका कोणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 10:10 IST2026-01-16T10:09:00+5:302026-01-16T10:10:18+5:30
- राजकीय पक्षांसाठी चिंतेचा विषय : सुमारे ६.७५ टक्क्यांची घट; सोसायट्या, उच्चभ्रू व मध्यमवर्गीय भागांत उदासीनता अधिक; उमेदवारांची धाकधूक वाढली; कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला; शहरात चर्चांना उधाण

PCMC Election Results 2026 : पिंपरी-चिंचवड महापालिकेत टक्का घसरला; फटका कोणाला?
पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत यंदा मतदारांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. शहरात केवळ ५८.६० टक्के मतदान झाले असून, २०१७ च्या निवडणुकीतील ६५.३५ टक्क्यांच्या तुलनेत सुमारे ६.७५ टक्क्यांची घट नोंदविली गेली आहे. ही घसरण राजकीय पक्षांसाठी चिंतेचा विषय ठरत असून, कमी मतदानाचा फायदा नेमका कोणाला होणार, याबाबत शहरात चर्चांना उधाण आले आहे.
सकाळी मतदान केंद्रांवर काही ठिकाणी उत्साह दिसून आला; मात्र दुपारनंतर मतदानाचा वेग लक्षणीयरीत्या मंदावला. काही प्रभागांमध्ये मतदार याद्यांतील गोंधळ, स्थलांतरित मतदारांची अनुपस्थिती, राजकीय उदासीनता, तसेच ‘कोण येणार आणि काय बदलणार?’ असा प्रश्न मतदारांमध्ये ऐकायला मिळाला. त्याचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर झाल्याचे जाणकारांचे मत आहे.
पुणे - पिंपरी चिंचवड महापालिका निकालाचे लाईव्ह अपडेट
सोसायट्या, उच्चभ्रू व मध्यमवर्गीय भागांत मतदानाचा टक्का अपेक्षेपेक्षा कमी राहिला. त्याउलट काही पारंपरिक वसाहती, झोपडपट्टी परिसरात तुलनेने चांगले मतदान झाले. त्यामुळे संघटित मतदार असलेल्या पक्षांना त्याचा फायदा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढला
सकाळी ७:३० वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासांत म्हणजेच ९:३० पर्यंत केवळ ६.५६ टक्के मतदान झाले. ११:३० पर्यंत हा आकडा १६.०३ टक्क्यांवर,
दुपारी दीडपर्यंत २८.१५ टक्के, तर दुपारी ३:३० पर्यंत ४०.५० टक्के मतदानाची नोंद झाली. संध्याकाळी ५:३० नंतर ५८.६० टक्के मतदान झाले.
कोणाच्या पथ्यावर पडणार घसरलेले मतदान?
काही राजकीय विश्लेषकांच्या मते, कमी मतदान सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाते, तर काही विश्लेषक म्हणतात की, कमी मतदान सत्ताधाऱ्यांना फायद्याचे असते. संघटित कार्यकर्ता, कोअर व्होटबँक आणि स्थानिक पकड मजबूत असलेल्या पक्षांना अशा परिस्थितीत फायदा होतो. दुसरीकडे, बदलाची अपेक्षा बाळगणारा मतदार घरीच बसल्यास विरोधकांना अपेक्षित यश मिळणे कठीण ठरू शकते.
निकाल काय सांगतो, याकडे सर्वांचे लक्ष
मतदानाचा टक्का घसरल्याने यंदाच्या निकालांमध्ये अनपेक्षित उलथापालथीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष मतमोजणीकडे लागले असून, ५८.६० टक्के मतदानाचा निकालांवर नेमका काय परिणाम होणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.