Eknath Shinde: ...म्हणून मतमोजणी लांबवली; एकनाथ शिंदे अन् भाजपाची रणनीती यशस्वी झाल्याची चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 01:59 PM2022-06-21T13:59:47+5:302022-06-21T14:07:02+5:30

Eknath Shinde: शिवसेनेचे आमदार काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्यावरून नाराज असल्याचा दावा करण्यात येत आहे.

विधान परिषद निकालात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्यानंतर शिवसेनेतील नाराजी आता उघड झाली आहे. निकाल लागल्यानंतर काल संध्याकाळपासूनच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत. त्यांच्यासह शिवसेनेचे काही आमदारांशी संपर्क होऊ शकत नसल्याची माहिती समोर आली आहे.

सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे असल्याचे सांगण्यात येत आहे. या हॉटेलबाहेर आता गुजरात पोलिसांनी देखील बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरत हा भाजपाच्या बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील काही आमदार संपर्काच्या बाहेर असल्याची कुणकुण लागताच वर्षा बंगल्यावर लागताच सर्व आमदारांची बैठक बोलावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

सूरत येथे गुजरात भाजप अध्यक्ष व खासदार सी.आर.पाटील यांच्यावर महाराष्ट्रातील सेना व काँग्रेस आमदारांची सोय करण्याची जबाबदारी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार खासदार पाटील यांनी सोमवारी सायंकाळी चार वेगवेगळ्या हॉटेल्स व रिसोर्टला व्हीआयपी,सूट बुक केले आहेत. मुंबईहून रात्री दहा शिवसेनेचे आमदार सूरतकडे रवाना झाले. रात्री दीडला एकनाथ शिंदे काही आमदारांसह सूरतकडे रवाना झाले.

राज्यात सोमवारी विधान परिषदेची निवडणूक पार पडली. या निवडणूकीसाठी मतदान झाल्यानंतर काहीवेळ गोंधळ पाहायला मिळाला. त्यामुळे मतमोजणीला थोडा उशीर झाला. मात्र एकनाथ शिंदे आणि भाजपाची ही एक रणनीती असल्याची चर्चा आता रंगली आहे.

एकनाथ शिंदे गटाला मुंबई बाहेर पडता येईल म्हणून मतमोजणी लांबवण्यात आली. विधान परिषदेचा निकाल येईपर्यंत एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील काही आमदार महाराष्ट्राबाहेर जाण्यास यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, शिवसेनेचे आमदार काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्यावरून नाराज असल्याचा दावा करण्यात येत आहे. या आमदारांनी शिवसेना भाजपासोबत गेल्यास आम्ही तुमच्यासोबत राहू असेही म्हटल्याचे समोर येत आहे.

शिवसेनेच्या आमदारांना विकासनिधी मिळत नाही, मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कामांना हा निधी दिला जातो. यावेळी आमदारांना विश्वासातही घेतले जात नाही. याच्या तक्रारी उद्धव ठाकरेंकडे केल्यावर त्याची दखलही घेतली जात नाही, अशा तक्रारी शिवसेना आमदारांच्या होत्या. या साऱ्या वातावरणातच राज्यसभेला शिवसेनाचा उमेदवार पडला, याची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे.