Maharashtra Lockdown: महाराष्ट्रात लॉकडाऊन, आता आयपीएल सामनेही रद्द होणार?

Maharashtra Lockdown: राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याचा आता आयपीएलवरही परिणाम होणार असल्याचं सांगितलं जात आहे. (lockdown like stricter curbs in maharashtra effect on ipl 2021)

महाराष्ट्रात सातत्यानं कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यानं आज रात्री ८ वाजल्यापासून पुढील १५ दिवसांसाठी राज्यात लॉकडाऊन सदृश्य नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

मुंबईमध्ये आयपीएल २०२१ चे सामने खेळवले जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या नव्या घोषणेचा परिणाम होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, आयपीएलचे सामने प्रेक्षकांविना खेळविण्यात येत आहेत आणि सर्व खेळाडू बायो बबलच्या नियमांचं पालन करत आहेत. त्यात सरकारनंही आयपीएलवर कोणतीही बंदी घातलेली नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या लॉकडाऊनच्या घोषणेचा फारसा फरक पडणार नाही असंही सांगितलं जात आहे.

मुंबईत वानखेडे स्टेडियमवर आयपीएलचे १० सामने खेळवले जाणार आहेत. यातील ९ सामने संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होणार आहेत.

मुंबईत सध्या आयपीएलचे पाच संघ दाखल आहेत आणि ते सर्व बायो बबलच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करुनच खेळत आहेत.

राज्य सरकारनं याआधीही राज्यात नाइट कर्फ्यू लावला होता तेव्हाही आयपीएल सामन्यांवर कोणतंही बंधन घालण्यात आलं नव्हतं. त्यावेळेसही नियमांचं पालन करुन रात्री ८ नंतरही नेट्समधील सरावाला परवानगी देण्यात आली होती.

आयपीएलचं आयोजन, खेळाडूंचा सराव आणि बायो बबलचे नियम याबाबत बीसीसीआयने राज्य सरकारशी चर्चा केली आहे. संघांच्या सरावासंदर्भात क्रिकेट मंडळाने सरकारकडे विनंती केली होती. त्यानंतर राज्य आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव श्रीरंग घोलप म्हणाले की, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि वानखेडे स्टेडियमवर दुपारी 4 ते सायंकाळी 6.30 या वेळेत आणि सायंकाळी 7.30 ते रात्री 10 वाजेपर्यंत अशा दोन सत्रांमध्ये खेळाडूंना सराव करता येईल.

मुंबईतील सर्व सामने वानखेडे स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत आणि इथले कर्मचारीही बायो बबलमध्ये मुक्काम करत आहेत. प्रत्येक खेळाडू, कर्मचारी, संघ व्यवस्थापन, पंच, ब्रॉडकास्टर, ग्राऊंड्समन आणि इतर संबंधित लोकांची दररोज कोरोना टेस्ट केली जात आहे.