...अन् विराट-रोहितमधला दुरावा संपला; वाचा सुखावणाऱ्या 'पॅचअपची' इनसाईड स्टोरी

irat Kohli And Rohit Sharma Renew Their Friendship In Quarantine And With Ravi Shastri S Guidance: कोरोना कामी आला, नियमांचा फायदा झाला; 'असा' संपला विराट-रोहितमधील दुरावा

कसोटी, टी-२० आणि एकदिवसीय अशा तिन्ही प्रकारांमध्ये भारतीय क्रिकेट संघानं इंग्लंडला धूळ चारली आहे. विशेष म्हणजे या मालिकेत भारतीय संघानं अनेकदा पिछाडीवर असताना जोरदार मुसंडी मारली. अनेक युवा खेळाडूंनी या मालिकेत आपलं कौशल्य दाखवून दिलं.

भारतीय संघ यशाच्या पायऱ्या चढत असताना कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यातील दुराव्याची कायम चर्चा होते. विराट आणि रोहित यांच्यात वाद असल्याच्या चर्चा होत असतात. मात्र आता विराट आणि रोहित यांच्यातील वाद संपला आहे.

कोरोना संकटामुळे संपूर्ण जग मेटाकुटीला आलं. अनेक निर्बंधांमुळे लोक त्रासले. मात्र कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे विराट आणि रोहित यांच्यातला दुरावा संपण्यास मदत झाली.

कोरोना काळात सुरू असलेल्या क्रिकेट मालिकांमध्ये खेळाडूंवर अनेक बंधनं आली आहेत. मात्र याच निर्बंधांचा सकारात्मक परिणामदेखील दिसून आला. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातला दुरावा संपून त्यांच्यात मैत्रीचं नातं निर्माण झालं आहे. टाईम्स ऑफ इंडियानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

इंग्लंडविरुद्ध मालिका सुरू असताना बायो बबलच्या नियमांमुळे विराट आणि रोहितकडे बराच वेळ होता. या कालावधीत प्रशिक्षक रवी शास्त्री आणि संघ व्यवस्थापनानं दोन्ही खेळाडूंशी चर्चा केली.

शास्त्री यांनी विराट आणि रोहितशी संवाद साधला. एकमेकांशी बोला आणि काही वाद असल्यास मिटवा, असा सल्ला शास्त्रींनी दोघांना दिला. त्यानंतर दोघांनी संघ सहकारी म्हणून नव्यानं आपल्या नात्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.

इंग्लंडला सर्व मालिकांमध्ये पराभूत केल्यामुळे ड्रेसिंग रुममध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र विराट आणि रोहित यांचे संबंध सुधारल्यानं इतर खेळाडूंचा आनंद द्विगुणीत झाला आहे.

कोरोना संकटामुळे खेळाडूंना दौऱ्यावर असताना बाहेर जाऊन मजामस्ती करण्याची फारशी संधी मिळत नाही. कठोर नियमांमुळे खेळाडू त्रासले आहेत. मात्र याच नियमांमुळे रोहित आणि विराटमधला दुरावा संपल्यानं संघात आनंदाचं वातावरण आहे.

इंग्लंड विरुद्धच्या मालिकांमध्ये विराट आणि रोहित यांच्यातला दुरावा कमी झाल्याचं पाहायला मिळालं. अनेकदा महत्त्वाच्या क्षणी विराट कोहली रोहित शर्माचा सल्ला देताना दिसला. रोहितनं पुढाकार घेत विराटला काही सूचना केल्या. विराटनंदेखील त्यांची अंमलबजावणी केली, असं भारतीय क्रिकेट चाहत्यांना सुखावणारं चित्र मैदानात पाहायला मिळालं.

मैदानावर चांगले संबंध राखल्यास मैदानाबाहेर होणाऱ्या उलटसुलट चर्चा टाळता येतील, असा सल्ला संघ व्यवस्थापनाकडून दोघांना देण्यात आल्या. त्यामुळेच टी-२० मालिका संपल्यानंतरच्या फोटोत दोन्ही खेळाडू जवळ दिसले. त्यामुळे कोरोना आणि त्यामुळे आलेल्या निर्बंधांचा भारतीय संघाला फायदा होताना दिसत आहे.