IPL 2020: जागा तीन अन् स्पर्धेत सहा टीम; जाणून घ्या प्ले-ऑफची सर्व समीकरणं

आयपीएलच्या तेराव्या पर्वात बाद फेरी गाठण्यासाठी प्रचंड चुरस पाहायला मिळत आहे. काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर मिळवलेल्या विजयामुळे मुंबई इंडियन्सचा बाद फेरीतला प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. मात्र उर्वरित तीन जागांसाठी सहा संघ स्पर्धेत आहेत. एकट्या चेन्नई सुपर किंग्जचा अपवाद वगळता सर्व संघांना बाद फेरी गाठण्याची संधी आहे.

मुंबई इंडियन्सचे १२ सामन्यांमध्ये १६ गुण आहेत. संघाचे दोन सामने शिल्लक आहेत. ३१ ऑक्टोबरला मुंबईचा मुकाबला दिल्ली कॅपिटल्सशी, तर ३ नोव्हेंबरला सनरायझर्स हैदराबादशी होईल. मुंबईचा नेट रनरेट पाहिल्यास संघाचा बाद फेरीतील प्रवेश जवळपास नक्की आहे. मात्र तरीही त्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झालेलं नाही. कारण सध्याच्या घडीला इतर ५ संघांचेही १६ गुण होऊ शकतात.

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या संघाला काल मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव पत्करावा लागेल. सध्या त्यांचे १२ सामन्यांत १४ गुण आहेत. ३१ ऑक्टोबरला ते सनरायझर्स हैदराबाद आणि २ नोव्हेंबरला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळतील. बाद फेरीत जाण्यासाठी त्यांना दोनपैकी एक सामना जिंकावा लागेल. दोन्ही सामन्यांत पराभूत झाल्यास त्यांना कोलकाता किंवा पंजाब एका सामन्यात पराभूत व्हावे यासाठी प्रार्थना करावी लागेल.

दिल्ली कॅपिटल्सलादेखील बाद फेरी गाठण्याची संधी आहे. त्यांचे दोन सामने मुंबई आणि बँगलोरविरुद्ध आहेत. सध्या १२ गुण असल्यानं दिल्लीला दोन सामन्यांत विजय मिळवावा लागेल. एक सामना जिंकूनही दिल्ली बाद फेरीत प्रवेश करू शकले. मात्र त्यांना इतर संघाच्या निकालांवर अवलंबून राहावं लागेल.

किंग्स इलेव्हन पंजाबचं यंदाच्या स्पर्धेतलं आव्हान जवळपास संपुष्टात आलं होतं. मात्र सलग पाच विजयांची नोंद घेत पंजाबनं फिनिक्स भरारी घेतली. दोन सामने जिंकल्यास (राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्सला नमवल्यास) पंजाब थेट बाद फेरीत जाईल. त्यांचा नेट रनरेट कोलकात्यापेक्षा जास्त चांगला आहे. त्याचाही त्यांना फायदा होईल. दोनपैकी एक सामना जिंकल्यासही ते बाद फेरी गाठू शकतात. मात्र या परिस्थितीत त्यांना इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावं लागेल.

कोलकाता नाईट रायडर्सचे १२ सामन्यांत १२ गुण झाले आहेत. बाद फेरी गाठण्यासाठी त्यांनी उर्वरित दोन सामने जिंकावे लागतील. यात त्यांना चेन्नई आणि राजस्थानचा सामना करायचा आहे. दोन्ही सामने जिंकल्यास कोलकात्याचे १६ गुण होतील. मात्र त्यांचा नेट रनरेट अतिशय वाईट आहे. त्यामुळे त्यांना दोन सामन्यांत मोठे विजय मिळवावे लागतील. कोलकात्याचा संघ एक सामना जिंकूनही बाद फेरीत जाऊ शकेल. पण मग त्यांच्यावर इतर संघांच्या निकालांनर अवलंबून राहण्याची वेळ येईल.

सनरायझर्स हैदराबादचे १२ सामन्यांत १० गुण आहेत. त्यांना दोन उर्वरित सामने जिंकावे लागतील. त्यात त्यांचा मुकाबला मुंबई आणि बँगलोरशी होईल. मात्र दोन सामने जिंकूनही त्यांना बाद फेरीत प्रवेश मिळेल याची खात्री नाही. उरलेल्या पाच संघांचे १६ गुण होऊ नयेत यासाठीही त्यांना प्रार्थना करावी लागेल.

राजस्थान रॉयल्सचेही १२ सामन्यांत १० गुण आहेत. राजस्थानचा नेट रनरेट खराब असल्यानं त्यांच्यापुढे असलेलं आव्हान खडतर आहे. त्यांना पुढील दोन सामन्यांत पंजाब आणि कोलकात्याचा मुकाबला करावा लागेल.

चेन्नई सुपर किंग्सचं यंदाच्या आयपीएलमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे. १२ सामन्यांत त्यांच्याकडे ८ गुण आहेत. मात्र ते कोलकाता आणि पंजाबलादेखील घरचा रस्ता दाखवू शकतात.

Read in English