मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण

IPL 2025, Qualifier 2: क्वालिफायर २ दरम्यान मुसळधार पाऊस पडला आणि सामन्याचा निकाल नाही लागला तर कोणता संघ अंतिम फेसीसाठी पात्र ठरेल याचा घेतलेला हा आढावा.

यंदाच्या आयपीएलमधील दुसरा क्वालिफायर सामना आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळवला जाणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये संध्याकाळी ७.३० पासून खेळवला जाणार आहे. या सामन्यामधील विजेता संघ हा अंतिम फेरीत प्रवेश करेल. या संघाची गाठ ३ जून रोजी खेळवल्या जाणाऱ्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी पडेल.

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात काही लढतींमध्ये पावसाचा व्यत्यय आल्याचे दिसून आले होते. तसेच पावसामुळे तीन सामने रद्द करावे लागले होते. अशा परिस्थितीत क्वालिफायर २ दरम्यान मुसळधार पाऊस पडला आणि सामन्याचा निकाल नाही लागला तर कोणता संघ अंतिम फेसीसाठी पात्र ठरेल याचा घेतलेला हा आढावा.

आयपीएलमधील नियमानुसार जर क्वालिफायर-१, एलिमिनेटर, क्वालिफायर-२ मध्ये पावसामुळे किमान ५-५ षटकांचाही खेळ होऊ शकला नाही तर सुपर ओव्हरच्या मदतीने विजेता ठरवला जाईल.

जर सुपर ओव्हरसुद्धा खेळता आली नाही तर पॉईंट्स टेबलमधील संघांच्या क्रमावीरनुसार अंतिम फेरीसाठीचा संघ निश्चित होईल. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला तर पंजाब किंग्सचा संघ अंतिम फेरीत पोहोचेल. कारण पंजाब किंग्स गुणतक्त्यात पहिल्या क्रमांकावर होता.

मात्र दिलासादायक बाब म्हणजे आज अहमदाबादमध्ये खेळवल्या जाणाऱ्या क्वालिफायर-२ दरम्यान, आकाश स्वच्छ राहील. तसेच संपूर्ण सामना विनाअडथळा खेळवला जाईल. अॅक्यूवेदर.कॉमच्या अंदाजानुसार १ जून रोजी पावसाची शक्यता २५ टक्के आहे. तर तापमान ३९ डिग्री सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. शनिवारी पंजाब किंग्सच्या सरावावेळी थोडा पाऊस पडला होता. मात्र आज पाऊस पडण्याची शक्यता फारच कमी आहे.