BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 11:49 IST2026-04-23T11:47:59+5:302026-04-23T11:49:33+5:30
शहरात विविध प्राधिकरणांकडून सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांचा पालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी सोमवारी पहाटे पाहणीदौरा केला. कामांसाठी नेमलेल्या कंत्राटदारांकडून कामाच्या ठिकाणी स्वच्छता राखली जात नसेल तर तात्काळ कारवाई करा, असे निर्देश दिले.

BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई: शहरात विविध प्राधिकरणांकडून सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांचा पालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी सोमवारी पहाटे पाहणीदौरा केला. कामांसाठी नेमलेल्या कंत्राटदारांकडून कामाच्या ठिकाणी स्वच्छता राखली जात नसेल तर तात्काळ कारवाई करा, असे निर्देश त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिले. बांधकाम साहित्य अनेक दिवस कामाच्या ठिकाणी पडून राहत असेल, मोकळ्या जागांवर बांधकामाचा राडारोडा हटविला नसेल, अशा कंत्राटदारांना नोटिस पाठवून कारवाई करा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.
पश्चिम उपनगरातील धर्मशाळा चौकी, शासकीय तंत्रनिकेतन समोर सुरू असलेली वांद्रे - खेरवाडी परिसरातील रस्त्यांची स्वच्छता, पश्चिम द्रुतगती महामार्ग, चर्चरोड मरोळ सेक्शन रस्ता चौकी, अंधेरी पूर्व येथील गुरू गोविंदसिंगजी मार्गावरील वाहनतळ, जे. बी. रोड मेट्रो स्टेशन चौकी, चर्चरोड मरोळ अंधेरी पूर्व येथील सावित्रीबाई फुले उद्यान अशा विविध ठिकाणी आयुक्तांनी सोमवारी पहाटे आकस्मिक भेट देऊन पाहणी केली.
‘अत्याधुनिक यंत्रसामुग्री प्राधान्याने वापरा’
मुंबई स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी कुशल मनुष्यबळ आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा योग्य वापर करावा. एखाद्या ठिकाणचा कचरा उचलल्यानंतर ती जागा लगेच स्वच्छ करा. प्रत्येक स्वच्छता कर्मचाऱ्याने वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करा. नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती करा. लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवा. आठवड्यातून एकदा प्रत्येक रस्ता स्वच्छ धुतला जावा, अशा सूचना आयुक्त अश्विनी भिडे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
‘मुंबईचे सौंदर्य वाढविण्यास प्रत्येकाने प्राधान्य द्यावे’
‘मुंबई क्लीन लीग’च्या पार्श्वभूमीवर शहरात स्वच्छता राखण्यासाठी पालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभागाने आपापसात तसेच इतर प्राधिकरणांशी समन्वय वाढवावा. आधुनिक यंत्रसामुग्री, कुशल मनुष्यबळाचा योग्य वापर करून शहरातील प्रमुख रस्ते-महामार्ग, त्याभोवतीचा परिसर, दुभाजक स्वच्छ ठेवावेत. मोकळ्या जागेवरील बांधकाम राडारोडा तत्काळ हटवून मुंबईचे सौंदर्य वाढविण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश दिले.