२,५०,००० विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ? खेरनगर शाळेत मिळतेय निकृष्ट खिचडी, पालकांमध्ये संताप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 13:28 IST2026-04-19T13:27:10+5:302026-04-19T13:28:28+5:30
वांद्रे - खेरनगर पालिका इंग्रजी शाळा क्र.२ मध्ये मात्र काही महिन्यांपासून निकृष्ट खिचडी येत असल्याने विद्यार्थी ही खिचडी न खाता बाथरूममध्ये फेकून देत असल्याचे चित्र समोर आले आहे.

२,५०,००० विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ? खेरनगर शाळेत मिळतेय निकृष्ट खिचडी, पालकांमध्ये संताप!
घन:श्याम सोनार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महापालिकेकडून माध्यान्ह भोजन योजना उत्तमपणे चालवली जाते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, वांद्रे - खेरनगर पालिका इंग्रजी शाळा क्र.२ मध्ये मात्र काही महिन्यांपासून निकृष्ट खिचडी येत असल्याने विद्यार्थी ही खिचडी न खाता बाथरूममध्ये फेकून देत असल्याचे चित्र समोर आले आहे.
केंद्राच्या माध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत महापालिका अडीच लाख विद्यार्थ्यांना नियमित आहार देते; मात्र खेरनगर शाळा क्र.२ मध्ये खिचडी निकृष्ट असल्याची काही विद्यार्थी पालकांची तक्रार आहे. त्याबाबत व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तसेच परिसरातील ९ पालिका शाळांना माध्यान्ह आहार देणाऱ्या प्रशांती महिला बचत गटप्रमुखांनी खिचडी दर्जेदार असून एखाद्यावेळी त्रुटी झाली असू शकते असेही सांगितले. तर शाळेत ६००-७०० विद्यार्थ्यांपैकी ६० टक्के विद्यार्थी खिचडी खात नसल्याचे शिक्षकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
माध्यान्ह भोजन योजना: शाळांचा तपशील आणि सद्यस्थिती
| अ.क्र. | शाळेचे नाव | माध्यम / विभाग |
| १ | खेरवाडी बीएमसी | हिंदी २ |
| २ | खेरनगर बीएमसी | सेक्शन २ |
| ३ | खेरनगर बीएमसी | सेक्शन १ |
| ४ | खेरनगर बीएमसी | उर्दू १ |
| ५ | खेरनगर बीएमसी | इंग्रजी १ |
| ६ | खेरनगर बीएमसी एल.पी. | उर्दू २ |
| ७ | खेरनगर एल.पी. | हिंदी |
| ८ | खेरनगर बीएमसी | मराठी |
| ९ | खेरनगर बीएमसी उच्च प्राथ. | मराठी |
जर काही ठिकाणी खराब खिचडी येत असेल तर याची चौकशी करून नियमानुसार कडक कारवाई केली जाईल. पालिका सदैव विद्यार्थी हिताला प्राधान्य देते, असे महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी कीर्तिवर्धन किरतकुडवे यांनी म्हटले आहे. तर, वरळी नगरसेविका पद्मजा चेंबुरकर म्हणाल्या की, "अत्यंत निकृष्ट दर्जाची खिचडी वितरित केली जात आहे. मुलांना ती खाण्यास अयोग्य असल्याने ते उपाशी राहतात, ही अत्यंत गंभीर बाब आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची तत्काळ चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी."
‘हा विद्यार्थ्यांवर अन्याय, चाैकशी करून कारवाई करा’
विद्यार्थ्यांना अनेक महिन्यांपासून निकृष्ट दर्जाची खिचडी दिली जात असेल, तर हे बरोबर नाही. हा विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. पालिकेने याची दखल घेऊन चौकशी करून कारवाई करण्याचे म्युनिसिपल समर्थ संघटनेचे सरचिटणीस ऋषिकांत घोसाळकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. व्हायरल व्हिडीओमध्ये विद्यार्थ्यांनी खिचडी निकृष्ट व बेचव असल्याचे सांगितले; ती खाण्यायोग्य नसल्याने फेकून देत भुकेले राहतात. दरम्यान शिक्षण विभागाने स्थानिक चौकशी सुरू केली आहे.