‘क्लस्टर’ पुनर्विकासातून मुंबईची स्कायलाईन बदलू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 13:44 IST2026-04-18T13:40:47+5:302026-04-18T13:44:49+5:30
Mumbai News: एका इमारतींचा पुनर्विकास करण्याऐवजी अनेक इमारतींना एकत्र करत समूह पुनर्विकासाच्या (क्लस्टर रिडेव्हल्पमेंट) माध्यमातून इमारती उभ्या करत रहिवाशांचे जनजीवन सुकर करण्याचा हेतू असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली.

‘क्लस्टर’ पुनर्विकासातून मुंबईची स्कायलाईन बदलू
मुंबई - एका इमारतींचा पुनर्विकास करण्याऐवजी अनेक इमारतींना एकत्र करत समूह पुनर्विकासाच्या (क्लस्टर रिडेव्हल्पमेंट) माध्यमातून इमारती उभ्या करत रहिवाशांचे जनजीवन सुकर करण्याचा हेतू असल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली. विशेषत: म्हाडा प्राधिकरणाच्या वतीने आजघडीला बीडीडी, कामाठीपुरासारखे अनेक प्रकल्प हाती घेण्यात आले असून, हे प्रकल्प मुंबईची स्कायलाइन चेंज करतील, असा विश्वास जयस्वाल यांनी व्यक्त केला.
गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या बृहत आराखड्याचे अनावरण म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते झाले. यावेळी जयस्वाल यांनी म्हाडातर्फे राबविलेल्या जात असलेल्या अनेक प्रकल्पांचे दाखले दिले. विशेषत: बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचा त्यांनी उल्लेख केला. कामाठीपुऱ्याचा पुनर्विकास होईल, असे वाटले नव्हते. मात्र ही प्रक्रिया सुरू झाल्याने रहिवाशांना चांगले घर मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोतीलाल नगर प्रकल्प सात वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मोतीलाल नगर प्रकल्प सात वर्षांच्या आत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट म्हाडाने ठेवले आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात गणेश मैदानात ८०० घरांचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. मोतीलाल नगर वसाहतींच्या कमी घनतेच्या लेआउटचा लाभ घेत म्हाडाने पुनर्वसन घटकांना १६०० चौरस फुटांचे घर दिले आहे. ८०० चौरस फुटाची दोन घरे निवडण्याचा प्रस्तावही रहिवाशांसमोर आहे. ४० मजली इमारतीच्या सहा विंग येथे बांधण्यात येतील.
मोठ्या वसाहतींचा पुनर्विकास टप्प्यात
मुंबई आणि उपनगरांमध्ये म्हाडाच्या ११४ वसाहती आहेत. मोतीलाल नगर, एसव्हीपी नगर, जीटीबी नगर, अभ्युदय नगर, कामाठीपुरा, आदर्श नगर आणि आराम नगर यांसारख्या मोठ्या वसाहतींचा पुनर्विकास टप्प्यात आहे.
म्हाडाने सी ॲण्ड डीए मॉडेलअंतर्गत (कन्स्ट्रक्शन ॲण्ड डेव्हलपमेंट एजन्सी) अंधेरी पश्चिम येथील सरदार वल्लभभाई पटेल (एसव्हीपी) नगर, वांद्रे रिक्लेमेशन आणि वरळी येथील आदर्श नगर अशा एकूण २०६.४९ एकर क्षेत्रासाठी निविदा मागवल्या.
रहिवाशांचे प्रकल्पांमध्ये पुनर्वसन केल्यानंतर आणि बांधकाम व्यावसायिकांसाठी मुक्त विक्री घटक राखून ठेवून, म्हाडाला गृहनिर्माण हिस्सा मिळणार आहे. जमीन मालक म्हाडा राहाणार आहे. आता कामाठीपुरा, चारकोप, गोराई व इतर अनेक ठिकाणी पुनर्विकास प्रकल्प राबविले जात आहेत. या माध्यमातून हजारो घरे मिळतील.