Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 10:10 IST2026-04-22T10:09:03+5:302026-04-22T10:10:20+5:30
Mumbai Local Train News: मध्य रेल्वे उपनगरीय सेवा सलग दुसऱ्या दिवशी कोलमडली. खर्डी स्थानकातील लांबलेल्या ब्लॉकचा आणि सकाळी डोंबिवली येथे अचानक घेण्यात आलेल्या ब्लॉकचा दुहेरी फटका मंगळवारी मुंबईकरांना बसला.

Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: मध्य रेल्वे उपनगरीय सेवा सलग दुसऱ्या दिवशी कोलमडली. खर्डी स्थानकातील लांबलेल्या ब्लॉकचा आणि सकाळी डोंबिवली येथे अचानक घेण्यात आलेल्या ब्लॉकचा दुहेरी फटका मंगळवारी मुंबईकरांना बसला. खर्डी रेल्वेस्थानकात सोमवारी रात्री ११:५० ते २:४५ या वेळेत नियोजित असलेले काम अपूर्ण राहिल्याने ब्लॉक प्रथम ३:३० वाजेपर्यंत वाढविण्यात आला. त्यानंतरदेखील काम पूर्ण न झाल्याने ब्लॉक पहाटे ६ वाजेपर्यंत वाढविण्यात आला. परिणामी, पहाटेपर्यंत रेल्वेमार्ग उपलब्ध न झाल्याने इगतपुरी आणि कसारादरम्यान ७ ते ८ मेल-एक्सप्रेस गाड्या खोळंबून राहिल्या.
या गाड्यांना मार्ग देण्यासाठी सकाळी जलद मार्गावरील लोकल उशिराने धावू लागल्या. याचा थेट परिणाम सकाळच्या लोकल सेवांवर झाला. कसाऱ्याकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासोबतच डोंबिवली स्थानकावर सकाळी ८:०५ ते दुपारी ८:३५ या कालावधीत प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वर ब्लॉक घेण्यात आला होता. तो ब्लॉक नंतर रद्द करून पुन्हा सेवा सुरळीत करण्यात आल्या. दरम्यान, काही कारणास्तव उशिरा झाल्यामुळे धीम्या मार्गावरील लोकलचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले होते. परिणामी कल्याण, डोंबिवली, दिवा आणि ठाणे स्थानकांवर सकाळी प्रचंड गर्दी उसळली.
अचानक निर्णयामुळे ताप
उशिरा धावणाऱ्या गाड्या, प्रचंड गर्दी आणि अनिश्चित वेळापत्रक यामुळे प्रवाशांचा संयम सुटल्याचे चित्र दिसले. नियोजनाचा अभाव आणि अचानक निर्णयांमुळेच हा गोंधळ निर्माण होतो, अशी नाराजी प्रवाशांकडून व्यक्त
होत आहे.
रेल्वेकडून सतत ब्लॉक घेतले जातात; मात्र ढिसाळ नियोजनामुळे त्यानंतरही बिघाड थांबत नाहीत. नियोजित वेळेत काम पूर्ण होत नाही. ब्लॉकचा त्रास मात्र प्रवाशांनाच सहन करावा लागतो; पण त्यातून अपेक्षित सुधारणा दिसून येत नाहीत. सलग दोन दिवस प्रवाशांचे हाल होत असतानाही जबाबदारी निश्चित केली जात नाही. रेल्वेच्या अधिकाऱ्यांवर कोणाचाही वचक उरलेला नाही. लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरीय प्रवासी महासंघ