आमदार वाढणार, पण कुठे बसणार? नागपूरची अडचण होणार दूर, मुंबईत काहीही तयारी नाही
By यदू जोशी | Updated: April 17, 2026 11:32 IST2026-04-17T11:32:09+5:302026-04-17T11:32:54+5:30
Vidhan Bhavan News: लोकसभेपाठोपाठ महाराष्ट्र विधानसभेची सदस्यसंख्या वाढणार असली तरी एवढ्या आमदारांना बसण्याची व्यवस्था विधानसभागृहात नाही. त्यामुळे त्याचा पुनर्विकास करण्यासह विविध पर्यायांवर विचार सुरू झाला आहे.

आमदार वाढणार, पण कुठे बसणार? नागपूरची अडचण होणार दूर, मुंबईत काहीही तयारी नाही
- यदु जोशी
मुंबई - लोकसभेपाठोपाठ महाराष्ट्र विधानसभेची सदस्यसंख्या वाढणार असली तरी एवढ्या आमदारांना बसण्याची व्यवस्था विधानसभागृहात नाही. त्यामुळे त्याचा पुनर्विकास करण्यासह विविध पर्यायांवर विचार सुरू झाला आहे. नागपूरच्या विधानभवनाचा पुनर्विकास करण्याची घोषणा आधीच केली असून, स्वरूपही स्पष्ट केले आहे.
विधानसभागृहाची आमदारांसाठीची आसनक्षमता ही सध्या ३०४ इतकी आहे. विधानसभा सदस्यांची सध्याची संख्या २८८ आहे. मात्र, आता राज्यात आमदारांची संख्या ही ३८० हून अधिक होण्याची शक्यता आहे. २०२९ ची निवडणूक वाढीव सदस्यसंख्येसह होणार असे चित्र आहे. आणखी साडेतीन वर्षे हातात असल्याने राज्य सरकार आणि विधानमंडळ विस्तारित विधानसभेसाठी कोणती पाऊले उचलणार हे महत्त्वाचे आहे.
विधानभवनात मध्यवर्ती सभागृह (सेंट्रल हॉल) आहे. त्याची आसनक्षमता ४७५ इतकी आहे. सेंट्रल हॉलचा उपयोग करावा हाही एक पर्याय आहे. त्यामुळे आमदारांची संख्या ४०० जरी झाली तरी अडचण येणार नाही. मात्र, त्यासाठी या सभागृहात बरेच अंतर्गत बदल करावे लागणार आहेत. विधानभवनची इमारत पाच माळ्यांची आहे आणि त्याला लागूनच विधानभवनचाच भाग असलेली विधानमंडळ सचिवालय इमारत ही २० माळ्यांची आहे. विधानभवनच्या पार्किंगची जागा खूप मोठी आहे. या सगळ्या परिसराचा एकत्रित पुनर्विकास करावा यावरही विचार केला जावू शकतो.
विधान परिषद सदस्य वाढले तरी अडचण नाही
मुंबईतील विधान परिषद सभागृहातील आमदारांची आसनक्षमता १३० असून सदससंख्या ७८ इतकी आहे. त्यामुळे सदस्यसंख्या वाढली तरी अडचण नाही.
कोरोना काळात विधानसभागृहात काही आमदारांना प्रेक्षक, अधिकारी गॅलरीत बसविण्यात आले होते.
नागपूरच्या विधानभवनाचा पुनर्विकास सेंट्रल व्हिस्टाच्या धर्तीवर केला जाणार आहे. मुंबईच्या विधानभवनाबाबतही त्याच धर्तीवर निर्णय करावा लागेल, त्या शिवाय पर्याय नाही. भविष्यात आमदारांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन आधीपासूनच त्या बाबतचे नियोजन केले जाईल.
- प्रा.राम शिंदे, सभापती विधान परिषद