Mumbai: पवई आयआयटी विद्यार्थ्याची आत्महत्या, वसतिगृहात खळबळ, तपास सुरू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 07:14 IST2026-02-05T07:14:03+5:302026-02-05T07:14:52+5:30
IIT Powai hostel suicide News: पवई आयआयटीमध्ये शिकणाऱ्या २१ वर्षीय बी.टेक विद्यार्थी नमन अग्रवाल मृतावस्थेत आढळल्याने वसतिगृहात एकच खळबळ माजली आहे.

Mumbai: पवई आयआयटी विद्यार्थ्याची आत्महत्या, वसतिगृहात खळबळ, तपास सुरू!
मुंबई: पवईच्या आयआयटीमध्ये बी.टेक.च्या (सिव्हिल इंजिनिअरिंग) द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या नमन अग्रवाल (२१) याने नऊ मजली वसतिगृह क्रमांक ४ च्या टेरेसवरून उडी मारली. मंगळवारी रात्री १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पवई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, तपास सुरू आहे.
उशिरापर्यंत अभ्यास करणारे काही विद्यार्थी व एक सुरक्षारक्षक यांना मोठा आवाज ऐकू आल्याने ते घटनास्थळी धावले. त्या ठिकाणी अग्रवाल गंभीर जखमी अवस्थेत पडलेला आढळला. त्याला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नमन हा राजस्थानमधील पिलानी येथील रहिवासी असून, त्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिल्याचे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे म्हणाले.
वसतिगृह क्रमांक ३ मध्ये राहत असलेला नमन वसतिगृह क्रमांक ४ मध्ये का गेला? याचा शोध घेण्यासाठी त्याच्या रूममेटसह इतर विद्यार्थ्यांची चौकशी सुरू आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत पुरावे आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
यापूर्वीही घडली घटना...
फेब्रुवारी २०२३ मध्ये दर्शन सोलंकी (वय, १८) या विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या टेरेसवरून उडी मारत आत्महत्या केली होती. त्यावेळी विशेष तपास पथक स्थापन करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली एका वर्गमित्राला अटक करण्यात आली होती.