गॅस तुटवड्यामुळे धारावीतील इडली व्यवसाय संकटात; २० टक्क्यांहून अधिक उद्योग बंद, मजुरांचे स्थलांतर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 11:43 IST2026-04-30T11:42:46+5:302026-04-30T11:43:26+5:30
धारावीत अनेक लघु उद्योग आहेत. एलपीजी तुटवड्यामुळे इडली उद्याेग संकटात आला आहे. अनेकांनी व्यवसाय बंद केले आहेत. जे अजून व्यवसाय करत आहेत.

गॅस तुटवड्यामुळे धारावीतील इडली व्यवसाय संकटात; २० टक्क्यांहून अधिक उद्योग बंद, मजुरांचे स्थलांतर
मुंबई : अमेरिका-इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या एलपीजी गॅसच्या तुटवड्याचा फटका धारावीतील प्रसिद्ध इडली व्यवसायालाही बसला. २० टक्क्यांहून अधिकांनी इडली उद्योग बंद केल्याने मजुरांचे स्थलांतर सुरू आहे.
धारावीत अनेक लघु उद्योग आहेत. एलपीजी तुटवड्यामुळे इडली उद्याेग संकटात आला आहे. अनेकांनी व्यवसाय बंद केले आहेत. जे अजून व्यवसाय करत आहेत, त्यांनाही उत्पादन कमी करावे लागत आहे, असे इडली व्यावसायिक सोलोमन शेखर यांनी सांगितले.
लघु उद्योजकांना आधार नाही
धारावीत पाइप गॅस पोहोचलेला नाही.
आर्थिक अडचणीत असलेले मजूर अधिक समस्यांना तोंड देत आहेत.
अत्यल्प नफ्यावर चालणाऱ्या लघु उद्योजकांकडे संकटांना तोंड देण्यासाठी आर्थिक आधार नाही.
पुनर्विकास महत्त्वाचा ?
घरे, पाइपलाइन गॅस जोडणी, नियमनबद्ध पुरवठा साखळी आणि स्थिर पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास लघू उद्योजकांना सततच्या अस्थिरतेपासून संरक्षण मिळू शकते. त्यांचे व्यवसाय अधिक स्थिरपणे चालू राहू शकतात. योग्य नियोजन केल्यास अखंडित इंधनपुरवठा होऊन रोजगार उपलब्ध होईल, याकडे जाणकारांनी सांगितले.
खानावळी, वस्त्र उद्योगालाही फटका
हे संकट केवळ अन्नापुरते मर्यादित नाही. लहान खानावळी बंद किंवा कमी प्रमाणात सुरू राहत आहेत. त्यामुळे यामध्ये काम करणारे कामगार स्थलांतरित होत आहेत. मजूर स्थलांतराचा परिणाम इतर उद्योगांवर, विशेषत: वस्त्र उद्योगावरही होत आहे. स्थैर्य नसल्यामुळे कामगार निघून जात आहेत, असे वस्त्र उद्योगाशी संबंधित जया महाकृष्णन यांनी सांगितले. अन्न व्यवसाय बंद पडले की उत्पन्न कमी होते. कामगार गेले की वस्त्र उद्योगालाही फटका बसतो. सर्व लहान व्यवसाय परस्परांशी जोडलेले आहेत.