जोगेश्वरीतील ट्रॉमा रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 11:02 IST2026-04-22T11:01:45+5:302026-04-22T11:02:15+5:30
जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात मेडिसिन विभागात पुरेसे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने या रुग्णालयात आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.

जोगेश्वरीतील ट्रॉमा रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात मेडिसिन विभागात पुरेसे वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने या रुग्णालयात आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. या परिस्थितीत वैद्यकीय विभागात एकही डॉक्टर उपलब्ध नसल्याने बाह्यरुग्ण विभाग, रुग्णकक्ष तसेच आपत्कालीन सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे रुग्णांना आवश्यक उपचार वेळेत मिळत नसून त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मेडिसिन ओपीडीचे काम ऑर्थोपेडिक, सर्जरी, ईएनटी आणि नेत्र विभागातील डॉक्टरांकडून तात्पुरत्या स्वरूपात चालवले जात आहे. हे डॉक्टर केवळ लक्षणांवर आधारित उपचार देत असून, गंभीर प्रकरणे पुढे पाठवली
जात आहेत.
आजारपणामुळे व रजेमुळे काही डॉक्टर रजेवर होते; मात्र आता ते कामावर परतले आहेत. या कालावधीत आम्ही एमबीबीएस डॉक्टरांना ओपीडीला बसवत होतो; त्यामुळे रुग्णांच्या सेवेवर त्याचा काहीही प्रतिकूल परिणाम झालेला नाही. राजीनामा दिलेल्या जागी दुसरे डॉक्टर रुजू झाले आहेत. रुग्णसेवा सुरळीत सुरू आहे. डॉ. हनुमंत वायकुळे, प्र. वैद्यकीय अधीक्षक
गरजेशिवाय रुग्णांना दाखल न करण्याच्या सूचना?
अत्यंत गरज असल्याशिवाय रुग्णांना दाखल न करण्याच्या सूचनाही दिल्याची माहिती सूत्रांंनी दिली. या परिस्थितीत रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होत असून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी रुग्ण व नागरिकांकडून होत आहे. आवश्यक तपासण्या वेळेवर होत नसून रुग्णांच्या उपचारात विलंब होत आहे.
‘डॉक्टरांची कमतरता त्वरित दूर करा’
प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन डॉक्टरांची कमतरता दूर करावी आणि बंद असलेली यंत्रणा तत्काळ सुरू करावी, अशी मागणी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून होत आहे.
‘या गंभीर समस्येबाबत महासभेत प्रश्न उठवणार’
- ग्णालयात सातत्याने काही ना काही समस्या उद्भवत असल्याने रुग्णांवर त्याचा परिणाम होतो.
- डॉक्टरांची कमतरता, कंत्राटी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न व इतर समस्यांबाबत महापालिकेच्या महासभेत प्रश्न उपस्थित करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेविका शिवानी परब यांनी दिली.