चार बटाटे नेले तर 'सरकार' चिडणार नाही ना?

By अतुल कुलकर्णी | Updated: January 25, 2026 13:25 IST2026-01-25T13:22:22+5:302026-01-25T13:25:19+5:30

हल्ली मिक्स भाजीचे दिवस आहेत. मराठवाड्यात भज्जी करतात... कोल्हापुरात मिक्स भाज्यांचे कालवण असते... विदर्भात भाजीची उसळ बनवतात... गुजराती लोक उंदियो करतात... तुम्ही पण सगळ्या भाज्या थोड्या थोड्या घ्या... शिवाजी पार्कच्या मळ्यात या ही वेळी फार कमी भाजी आली आहे... वांद्रेच्या मळ्यात सगळ्या नव्या भाज्या आल्यात... बारामतीचे वाण वेगवेगळे झाल्यापासून त्यांची भाजी चांगली येत नाही

Wouldn't the 'government' get angry if four potatoes were taken away? |  चार बटाटे नेले तर 'सरकार' चिडणार नाही ना?

 चार बटाटे नेले तर 'सरकार' चिडणार नाही ना?

- अतुल कुलकर्णी
(संपादक, मुंबई)

प्रिय अशोक नायगावकर, नमस्कार तुम्ही भाजीपाल्यावर कविता लिहिली म्हणून सकाळी भाजी मंडईत जो थरार आम्ही अनुभवला तो तुम्हाला सांगितला पाहिजे. जुन्या कांद्याला पडका भाव आणि नव्या कांद्याला भलताच भाव बघून चक्रावून गेलो. खरंतर जुना कांदा वजनाने हलका, बहुगुणी... पण त्याला कोणी विचारेना... अन् नव्या कांद्याला कोणी सोडेना..! सगळ्या मंडईत हीच अवस्था होती. तिथे एक कल्याणचा भाजीवाला होता. त्याने दादरच्या गिऱ्हाईकासाठी पाच-सहा नवे कांदे आणले होते. पण ते ठाण्याच्या माणसाने मधल्या मध्येच नेले ना... त्यावर शिवाजी पार्कातले ग्राहक नाराज झाले. असल्या भाजीवाल्यांची शिसारी आली असेही म्हणाले. नायगावकर, तुम्हाला सांगतो, भाजी एकाची, भाव ठरवणारा दुसरा, नेणारा तिसरा, खाणारा चौथा... ज्याने पिकवलं तो बसला हात चोळत... खतरनाक सीन होता मंडईत. काही अनोळखी भाज्या कुठून आल्या होत्या कोणास ठाऊक..? पण ठाण्यातली, विदर्भातली माणसं आली, की त्या भाज्या पटापटा थेट त्यांच्या पिशवीत जाऊन बसायच्या...

भाजीवाला म्हणत होता, हल्ली मिक्स भाजीचे दिवस आहेत. मराठवाड्यात भज्जी करतात... कोल्हापुरात मिक्स भाज्यांचे कालवण असते... विदर्भात भाजीची उसळ बनवतात... गुजराती लोक उंदियो करतात... तुम्ही पण सगळ्या भाज्या थोड्या थोड्या घ्या... शिवाजी पार्कच्या मळ्यात या ही वेळी फार कमी भाजी आली आहे... वांद्रेच्या मळ्यात सगळ्या नव्या भाज्या आल्यात... बारामतीचे वाण वेगवेगळे झाल्यापासून त्यांची भाजी चांगली येत नाही. फार थोडी भाजी आली आहे त्यांची. पाहिजे तर घेऊन जा. ती भाजी बटाट्यासारखी कशातही पटकन मिसळते. तिची पहिल्यासारखी चव नाही उरली... पालेभाज्या नेताना जपून न्या. काँग्रेस गवत कोणत्याही भाजीत असू शकते. कितीही उपटायचा प्रयत्न केला तरीही काँग्रेस गवत काही जात नाही... त्यामुळे ते निवडून निवडून बाजूला काढावे लागते... विदर्भातली वांगी हल्ली फारच फेमस आहेत. कुठे पण उगवतात..! पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा सगळीकडे विदर्भातल्या वांग्यांचा पीक जोरात आहे... मुंबईत सुद्धा विदर्भातली वांगी चांगली आली आहेत... या वांग्याची भाजी खाल्ली की छान झोप लागते... कशाचीही चिंता उरत नाही...

ठाण्यातल्या मळेवाल्याने त्याचं बियाणं सगळीकडे दिलं होतं... ठाण्यात पीक चांगलं आलं... इतर ठिकाणी फारसं आलं नाही. पण ठाण्यातला माळी दिलदार आहे. फुकट पण भाजी द्यायला तयार असतो... वेळप्रसंगी तुमची भाजी चढ्या दामाने विकत घ्यायची त्याची तयारी असते... सगळ्या भाज्या घेऊन घरी जा... मस्त मिक्स भाजी करा... वहिनीसाहेब खुश होतील... अरे पण चार दोन बटाटे इकडेचे तिकडे नेले तर तुझे सरकार रागावणार तरी नाही ना... त्यावर तो शंकायुक्त नजरेने पाहात होता...

नायगावकर, तुमची शाकाहारी कविता आता कामाची राहिली नाही. दुधी भोपळ्याची त्वचा क्रूरपणे सोलली गेली तरी... संत्र्या, मोसंब्या, केळ्यांची साल उतरवली गेली बाजारात तरी... फडकण्याने गळा आवळून मुसक्या बांधून दह्याला फासावर चढवलंय चक्क बनवण्यासाठी तरी... धारेवर किसली जातायत गाजरं, पिळवणूक चाललीय आंब्याची तरीही... नायगावकर, आता काळ बदलला आहे. या अशा भाज्यांच्या कथित अन्यायाकडे सगळी भाजी मंडई आणि भाजी घेणारे पूर्ण दुर्लक्ष करायला शिकले आहेत... भाज्या पिकवणारे सुद्धा त्यांना हव्या तशाच भाज्या पिकवतात... वांगी, शहाळी विशिष्ट आकाराचीच पिकवतात... कोणत्या भाजीत किती गोडी असावी? कोणती भाजी किती तिखट ठेवावी? कोणती फळं किती आंबटगोड असावी? हेदेखील हल्ली तेच ठरवतात... निसर्गावर विसंबून राहणं हल्लीच्या भाजीवाल्यांनी सोडून दिलं आहे... सगळ्या भाज्यांनी दुसऱ्या भाजीवर होणाऱ्या अन्यायाकडे न्याय भावनेतून बघणे सुरू केले आहे... आम्ही देऊ तीच भाजी घ्या आम्ही सांगू तोच मसाला वापरा आणि जेवण छान झाले म्हणून टीव्ही बघत बसा, असेही भाजीवाले सांगतात हल्ली... तेव्हा, नायगावकर आता या नव्या भाजी पद्धतीवर कविता करायला लागा...

- तुमचाच, बाबुराव

Web Title : क्या चार आलू लेने पर 'सरकार' नाराज होगी?

Web Summary : बाजार की गतिशीलता, सब्जियों की कीमतों और बदलती कृषि पद्धतियों पर एक विनोदी टिप्पणी। किसान प्राकृतिक उपज के बजाय लाभ को प्राथमिकता देते हैं। उपभोक्ता बदली हुई वास्तविकता को स्वीकार करते हैं।

Web Title : Will 'the government' get angry if four potatoes are taken?

Web Summary : A humorous take on market dynamics, vegetable prices, and changing agricultural practices. Farmers adapt, prioritizing profit over natural produce. Consumers accept the altered reality.