अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांची खरी कसोटी; राज्यासमोर विविध प्रश्न असले तरी मांडणारे विरोधक विखुरलेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 09:01 IST2026-02-23T08:26:48+5:302026-02-23T09:01:22+5:30
विधानसभा आणि विधानपरिषदेत एकीकडे विरोधी पक्षनेता नसताना दुसरीकडे आतापर्यंत एकत्र असलेल्या महाविकास आघाडीत एकी नसल्याचे चित्र समोर आले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांची खरी कसोटी; राज्यासमोर विविध प्रश्न असले तरी मांडणारे विरोधक विखुरलेले
मुंबई: राज्य विधानमंडळचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज, सोमवारपासून मुंबईत विधानभवनात सुरू होत आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेत एकीकडे विरोधी पक्षनेता नसताना दुसरीकडे आतापर्यंत एकत्र असलेल्या महाविकास आघाडीत एकी नसल्याचे चित्र समोर आले आहे. राज्यात विविध प्रश्न असले तरी ते आक्रमकपणे मांडण्याची विखुरलेल्या विरोधकांची कसोटी लागणार आहे, तर दुसरीकडे विरोधकांमध्ये एकी नसल्याने सत्ताधारी या अधिवेशनात निर्धास्त असणार आहेत.
अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे. अभिभाषण झाल्यानंतर पहिल्याच दिवशी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विधानसभा आणि विधानपरिषदेत शोकप्रस्ताव मांडला जाईल. अधिवेशनाचे खरे कामकाज मंगळवारपासून सुरू होईल.
विरोधकांमध्ये एकी नसल्याने सत्ताधारी निर्धास्त
सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ जास्त असल्यामुळे गेल्या काही अधिवेशनातही सत्ताधारी बाजूचे वर्चस्व राहिले आहे, पण विरोधकांनी काही प्रश्नांवर सरकारला यापूर्वी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यावेळी विरोधकांमध्ये एकी नसल्याने प्रचंड संख्याबळ असलेल्या सत्ताधाऱ्यांना विरोधक कसे अडचणीत आणणार हा प्रश्न आहे.
तिजोरीवर ताण पाहता नवीन घोषणांकडे लक्ष
कापूस, सोयाबीन, धानाच्या भावाचा प्रश्न, अमेरिकेबरोबरच्या करारामुळे शेतकऱ्यांवर होणारे परिणाम, शेतकरी कर्जमाफी, राज्यातील कायदा व सुव्यवस्था, राज्यातील आरोग्य व्यवस्था, महागाई, बेरोजगारी, महिलांचे प्रश्न, आदी मुद्दे विरोधकांकडून उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे.
यंदा अर्थमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. राज्यावरील वाढते कर्ज, लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर पडलेला ताण आणि त्यामुळे इतर योजनांच्या खर्चाला लागलेली कात्री या पार्श्वभूमीवर फडणवीस काय नवीन घोषणा करतात याकडे लक्ष असेल.
