राहुल गांधींनी थेट आम्हाला संपर्क साधायला हवा होता, विधानसभेतील मतफिक्सिंगच्या आरोपांबाबत निवडणूक आयोगाचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 08:08 IST2025-06-09T08:08:22+5:302025-06-09T08:08:49+5:30

Rahul Gandhi News: केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला २४ डिसेंबर २०२४ रोजी सविस्तर उत्तर पाठवले असून, त्यात त्यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर स्पष्ट आणि तपशीलवार स्पष्टीकरण दिले आहे.

Rahul Gandhi should have contacted us directly, says Election Commission on allegations of vote-fixing in the Assembly | राहुल गांधींनी थेट आम्हाला संपर्क साधायला हवा होता, विधानसभेतील मतफिक्सिंगच्या आरोपांबाबत निवडणूक आयोगाचे उत्तर

राहुल गांधींनी थेट आम्हाला संपर्क साधायला हवा होता, विधानसभेतील मतफिक्सिंगच्या आरोपांबाबत निवडणूक आयोगाचे उत्तर

मुंबई  - केंद्रीय निवडणूक आयोगाने काँग्रेस पक्षाला २४ डिसेंबर २०२४ रोजी सविस्तर उत्तर पाठवले असून, त्यात त्यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्द्यांवर स्पष्ट आणि तपशीलवार स्पष्टीकरण दिले आहे. या अधिकृत पत्रव्यवहारानंतरही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माध्यमांद्वारे पुन्हा शंका उपस्थित करत आरोप केल्याने आयोगाने याबाबत प्रसिद्धिपत्रक जारी करून खेद व्यक्त केला आहे.

आयोगाने म्हटले आहे की, निवडणूक आयोग स्वतंत्र व संविधानिक संस्था आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा त्याच्या नेत्याने थेट पत्राद्वारे संपर्क साधल्यास, आम्ही निश्चितच उत्तर देतो आणि देत आलो आहोत. राहुल गांधी यांनी आयोगाशी संवाद साधण्याऐवजी वारंवार माध्यमांतून आरोप करणे हे आश्चर्यकारक व खेदजनक असल्याचे आयोगाचे मत आहे. त्यांनी माध्यमांमध्ये प्रश्न उपस्थित करण्याऐवजी थेट निवडणूक आयोगाशी पत्राद्वारे संपर्क साधावा. आमची प्रक्रिया पारदर्शक व ठोस आहे, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. हा संवाद माध्यमांमधून न करता थेट आयोगाशी केल्यास, लोकशाही प्रक्रियेस अधिक बळकटी मिळेल, असे  निवडणूक आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे म्हटले आहे.

‘प्रश्न आयोगाला, मिरची भाजपला का लागली?’ 
विधानसभा निवडणुकीतील मतांच्या चोरीच्या प्रश्नावर राहुल गांधी यांनी लेख लिहून गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, पण त्याची मिरची मात्र भाजपला का लागली, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत केला. प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले आहेत, त्याची उत्तरे त्यांनी देणे अपेक्षित असताना भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेख लिहून उत्तरे दिली आहेत. त्यांचा  लेख म्हणजे जनतेला भ्रमित करण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याची टीका सपकाळ यांनी केली आहे. भाजप युती हीच मतांच्या चोरीचे लाभार्थी आहे, ते आरोपी आहेत आणि तेच उत्तरे देत आहेत, असा आरोप देखील सपकाळ यांनी केला.   

...हे तर फिक्सिंगवर शिक्कामोर्तबच : काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत फसवणूक, हेराफेरी व जनादेशाचे पद्धतशीर उल्लंघन करून लोकशाहीचे वस्त्रहरण कसे केले गेले याची राहुल गांधी यांनी लेखातून तर्कसंगत मांडणी केलेली आहे. निवडणूक आयोगाने या गंभीर प्रश्नांची उत्तरे देऊन संभ्रम दूर करणे अपेक्षित असताना भाजपकडून उत्तरे दिली जात आहेत हे आणखी गंभीर असून निवडणुकीत फिक्सिंग झाले यावर शिक्कामोर्तब करणारे आहे, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी म्हटले आहे. 
चेन्नीथला म्हणाले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जे घडले ते अतिशय काळजीपूर्वक आखलेले ऑपरेशन होते. लोकशाही प्रक्रियेवर एक सुनियोजित हल्ला होता. राहुल गांधी यांच्या सविस्तर खुलाशातून हे विचलित करणारे सत्य उलगडले आहे. निवडणूक आयोगाकडे काँग्रेस पक्ष सातत्याने पाठपुरावा करत आहे, पण आयोगाकडून त्यावर समाधानकारक खुलासा केला जात नाही. आयोगाकडून केवळ वरवरची उत्तरे दिली जात आहेत. 

Web Title: Rahul Gandhi should have contacted us directly, says Election Commission on allegations of vote-fixing in the Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.