लातूरात भाजपसमोर बंडोबांचे आव्हान; पक्षादेश झुगारून रिंगणात, उमेदवारांची धाकधूक वाढली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 17:51 IST2026-01-03T17:49:32+5:302026-01-03T17:51:27+5:30
पक्षादेश झुगारून रिंगणात उतरलेल्यामुळे अनेकांची अडचण होणार

लातूरात भाजपसमोर बंडोबांचे आव्हान; पक्षादेश झुगारून रिंगणात, उमेदवारांची धाकधूक वाढली!
लातूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर आता राजकीय रणधुमाळीला खऱ्या अर्थाने वेग आला आहे. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या टप्प्यात भाजपमध्ये मोठी बंडाळी पाहायला मिळत आहे. पक्षाने उमेदवारी नाकारल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले अपक्ष अर्ज कायम ठेवले असून, यामुळे पक्ष नेतृत्वापुढे पेच निर्माण झाला आहे.
लातूर मनपासाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. शुक्रवारी, २ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत होती. पक्ष नेतृत्वाने नाराजांची समजूत काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र अनेक प्रभागांत इच्छुकांनी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. पक्षादेश झुगारून रिंगणात उतरलेल्या या बंडखोरांमुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. बंडखोरीमुळे मतांचे विभाजन होऊन त्याचा थेट फायदा विरोधी पक्षांना मिळण्याची भीती व्यक्त होत आहे.
राजकीय वर्तुळातील चर्चा..!
बंडखोरांची मनधरणी करण्यात वरिष्ठ नेत्यांना अपेक्षित यश आलेले नाही. आता ही बंडखोरी शमवण्यासाठी पक्ष आगामी काळात कोणती ठोस भूमिका घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही महत्त्वाच्या प्रभागांमध्ये भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनीच अपक्ष म्हणून दंड थोपटले आहेत. वर्षानुवर्षे पक्षाचे काम करूनही डावलले गेल्याची भावना या इच्छुकांनी व्यक्त केली आहे. याअंतर्गत कलहामुळे अधिकृत उमेदवारांना आता केवळ विरोधकांशीच नव्हे, तर आपल्याच पक्षातील नाराजांशीही लढावे लागणार आहे. दरम्यान, आता प्रचाराचा धुरळा उडणार असून, या बंडखोरीचा फटका नेमका कोणाला बसतो आणि पक्ष यावर कशी मात करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.