अमित देशमुख बाभळगावात राहतात, मग लातूर बाहेरचे कोण आहे? संभाजी पाटील यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 15:00 IST2026-01-06T14:56:48+5:302026-01-06T15:00:02+5:30
विलासराव देशमुख यांच्या पुण्याईवर काँग्रेसला लातूरकरांनी निवडून दिले. पुण्याईचा हा चेक आता कॅश होणार नाही.

अमित देशमुख बाभळगावात राहतात, मग लातूर बाहेरचे कोण आहे? संभाजी पाटील यांचा सवाल
लातूर : काँग्रेसकडून भाजप आमदारांना हे बाहेरचे असे बोलून दिशाभूल केली जात आहे. आ. अमित देशमुख हे स्वत: मनपा हद्दीच्या बाहेर बाभळगावला राहतात, मग खरे बाहेरचे कोण? असा सवाल माजी मंत्री आ. संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सोमवारी बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केला. माजी मंत्री आ. निलंगेकर म्हणाले, आ. संभाजी पाटील हे निलंग्याचे, आ. अभिमन्यू पवार औश्याचे, आ. रमेश कराड रेणापूरचे असे सांगत काँग्रेसकडून दिशाभूल सुरू आहे. परंतु, माझे स्वत:चे घर प्रभाग १७ मध्ये आहे. अभिमन्यू पवार प्रभाग १३ मध्ये राहतात. डॉ. अर्चना पाटील-चाकूरकर प्रभाग १५ मध्ये राहतात. माजी खा. डॉ. सुनील गायकवाड प्रभाग १२ मध्ये राहतात. तर आ. रमेश कराड यांचे घरही महापालिकेच्या हद्दीत आहे. याउलट आ. अमित देशमुख मनपा हद्दीबाहेर बाभळगावला राहतात, मग खरे बाहेरचे कोण आहे?
आ. निलंगेकर एवढ्यावरच थांबले नाहीत, तर ते म्हणाले, माझे शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालयात झाले. रमेश कराड रामेश्वरला शिकले. डॉ. अर्चनाताईंचे शिक्षण लातूरला झाले. अभिमन्यू पवार श्री केशवराज विद्यालयात शिकले आणि अमित देशमुख हे मुंबईत राहून शिकले. त्यांना लातूरच्या समस्यांची जाणीव नाही. डॉ. अर्चना पाटील-चाकूरकर म्हणाल्या, विधानसभेमध्ये थोड्या मताने पराभूत झाल्याची सल सर्वांच्याच मनात आहे. ती भरून काढण्यासाठी लातूरकर भाजपसोबत राहतील.
मंचावर प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण, मराठवाडा सरचिटणीस संजय कोडगे, आ. रमेश कराड, आ. अभिमन्यू पवार, कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, भाजपा नेत्या डॉ. अर्चनाताई पाटील-चाकूरकर, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष माजी राज्यमंत्री बसवराज पाटील-मुरूमकर, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील-कव्हेकर, माजी खा. डॉ. सुनील गायकवाड, माजी आ. त्र्यंबकनाना भिसे, अविनाश कोळी, सुधीर धुत्तेकर यांच्यासह मंडळ अध्यक्षांची उपस्थिती होती.
विधानसभेची कसर मनपात भरून काढा...
आ. निलंगेकर म्हणाले, विधानसभेची कसर लातूरच्या जनतेने मनपात भरून काढावी. विलासराव देशमुख यांच्या पुण्याईवर काँग्रेसला लातूरकरांनी निवडून दिले. पुण्याईचा हा चेक आता कॅश होणार नाही. तो बाऊन्स होईल. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकासाचा चेक दिल्लीतून गल्लीत आणायचा आहे. यावर्षी मकर संक्रांतीच्या करीवर मतदान होईल अन् ती कर काँग्रेसवर येणार आहे, असेही ते म्हणाले.