Coronavirus Unlock : इचलकरंजीत लॉकडाऊन कडक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 11:00 IST2020-07-03T10:58:51+5:302020-07-03T11:00:33+5:30
इचलकरंजीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून हा समूह संसर्ग झाला आहे. त्यामुळे शहरातील नऊ कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कडक करावा, अशी मागणी नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी रुग्णाचा तपासणी अहवाल येण्यापूर्वीच प्रशासनाने मृतदेह ताब्यात देऊन चूक केली, असा आरोप केला.

कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी इचलकरंजीतील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुरेश हाळवणकर, आमदार प्रकाश आवाडे, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित होते.
कोल्हापूर : इचलकरंजीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून हा समूह संसर्ग झाला आहे. त्यामुळे शहरातील नऊ कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन कडक करावा, अशी मागणी नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी रुग्णाचा तपासणी अहवाल येण्यापूर्वीच प्रशासनाने मृतदेह ताब्यात देऊन चूक केली, असा आरोप केला.
इचलकरंजीमध्ये आठवड्यात ४० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून येथील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी बैठक घेतली. यावेळी नगराध्यक्षा अलका स्वामी, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, सीपीआर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक उपस्थित होत्या.
यावेळी अलका स्वामी म्हणाल्या, इचलकरंजीत समूह संसर्ग सुरू झाल्याने येथे लॉकडाऊन कडक करणे गरजेचे आहे. अन्यथा मालेगाव आणि भिवंडीसारखी स्थिती होण्याची शक्यता आहे. ई-पासमुळे परजिल्ह्यांतून नागरिक येत असल्याने धोका अधिक आहे.
खासदार धैर्यशील माने यांनी, शहरात सद्य:स्थितीत लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही; त्यामुळे सगळ्यांची मागणी लक्षात घेऊन नियमांची कडक अंमलबजावणी करावी. या काळात रॅपिड टेस्ट कराव्यात, अशी सूचना दिली; तसेच रुग्णाचा अहवाल येण्यापूर्वीच सीपीआरने मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देणे ही गंभीर चूक असल्याचा आरोप केला. यावर हर्षला वेदक यांनी मृतदेह ताब्यात दिल्याने संसर्ग वाढला नसल्याचे सांगितले.
आमदार प्रकाश आवाडे यांनी शहरात नऊ कंटेन्मेंट झोन असूनही तेथे लॉकडाऊन नियमांची कडक अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. यानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सगळ्या सूचनांचा विचार करून निर्णय घेऊ, असे सांगितले.