केडीएमसी : तणावपूर्ण वातावरणात मतदान, काही प्रभागांमध्ये मतदारांच्या नावावर बोगस मतदान केल्याच्या तक्रारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 07:44 IST2026-01-16T07:42:29+5:302026-01-16T07:44:25+5:30
KDMC Election 2026: पोलिसांचा ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त

केडीएमसी : तणावपूर्ण वातावरणात मतदान, काही प्रभागांमध्ये मतदारांच्या नावावर बोगस मतदान केल्याच्या तक्रारी
कल्याण-डोंबिवली कल्याण : महापालिका निवडणुकीकरिता मतदान केल्यानंतर मतदारांच्या बोटाची पुसली जाणारी शाई, काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या नावावर अगोदरच कुणीतरी केलेले बोगस मतदान आणि उमेदवारांची नावे लावताना मतदान यंत्रात झालेला घोळ यामुळे काही भागांत गुरुवारी गोंधळ व संतापाचे वातावरण होते. मात्र, एकूण मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडली. निवडणुकीच्या दोन दिवस आधीच एका प्रभागात प्रचारास हिंसक वळण लागल्याने त्या प्रभागात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
पॅनल क्रमांक ९ मध्ये मनसेच्या उमेदवार उर्मिला तांबे यांनी आरोप केला की, मतदारांच्या बोटाला लावलेली शाई पुसली जात आहे. तांबे यांनी ही तक्रार निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली. दुपारी मतदान केलेल्या काही मतदारांच्या बोटाला शाई लावलीच गेली नाही, असा दावा तांबे यांनी केला.
पॅनल क्रमांक ४ मध्ये उद्धवसेनेच्या उमेदवार रूपा शेट्टी यांनी मतदान केंद्रात ठाण मांडेल होते. त्याला शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार हरकत घेत गोंधळ घातला. त्यामुळे शेट्टी यांना केंद्रातून काढता पाय घ्यावा लागला. कल्याण पश्चिमेतील मिलिंदनगर परिसरातील मतदान केंद्रावर मनसे आणि काँग्रेस उमेदवारांनी गोंधळ घातला. कल्याण टिटवाळा येथील राष्ट्रवादी (शरद पवार) चे उमेदवार शेखर अप्पा वाकोडे यांचे नाव मतदान यंत्रावर शेख अप्पा वाकोडे असे लिहिले होते
अधिकाऱ्यांचे अजब उत्तर
कल्याण पूर्वेतील गायत्री शाळेतील मतदान केंद्रावर सुमन गायकवाड या मतदान करण्यासाठी पोहोचल्या. त्यांच्या नावावर अन्य दुसरा कोणी मतदान करून गेला होता. हरकिसनदास रुग्णालयाच्या शेजारच्या इंग्रजी शाळेत रमेश पवार हे मतदान करण्यासाठी गेले असता, त्यांच्या नावावर कोणी तरी मतदान केला होते. पवार यांनी अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता मतदान करणारा ओळखपत्र दाखवून मतदानासाठी गेल्याचे सांगितले.