चाळीसगाव पालिकेतर्फे कोणतीही करवाढ नाही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 16:34 IST2021-02-25T16:34:01+5:302021-02-25T16:34:35+5:30
कोणतीही करवाढ नसलेला शिलकी अर्थसंकल्प गुरुवारी पालिकेच्या सभेत सादर करण्यात आला.

चाळीसगाव पालिकेतर्फे कोणतीही करवाढ नाही...
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : कोणतीही करवाढ नसलेला शिलकी अर्थसंकल्प गुरुवारी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी मांडला. सकाळी ११ वाजता ऑनलाईन झालेल्या सर्वसाधारण सभेत त्यावर चर्चाही झाली.
विद्यमान सदस्यांच्या कार्यकाळाचे हे शेवटचे वर्ष असून येत्या काही महिन्यात पालिकेच्या निवडणुकीचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे याअर्थसंकल्पाविषयी शहरवासियांना देखील मोठी उत्सुकता होती. विरोधकांनी केलेल्या सुचनाही स्विकारण्यात आल्या.
ऑनलाईन झालेल्या या सभेला उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, भाजपाचे गटनेते संजय रतनसिंग पाटील, शविआचे उपनेते सुरेश स्वार, राजेंद्र चौधरी, दिपक पाटील, शेखर देशमुख, सविता राजपूत, सूर्यकांत ठाकूर, अरुण अहिरे, घृष्णेश्वर पाटील, विजया पवार, चंद्रकांत तायडे, रामचंद्र जाधव, आनंदा कोळी, रवींद्र चौधरी, वंदना चौधरी, सायली जाधव, विजया भिकन पवार, संगीता गवळी, आनंद खरात, सुरेश चौधरी, चिरागोद्दीन शेख, मानसिंग राजपूत, शेखर बजाज, वैशाली राजपूत, वैशाली मोरे या सदस्यांसह मुख्याधिकारी विकास नवाळे सहभागी झाले होते. कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार पाहता ही सभा अॉनलाईन घेण्यात आली.
१३ लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प
नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या कारकिर्दीतील हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने त्या भावूक झाल्या होत्या. शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामांचा उल्लेख करतानाच एका सर्वसामान्य गृहीणीला शहरवासियांनी पालिकेचे नेतृत्व करण्याची दिलेल्या संधीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. १३ लाख ६० हजार ३२० रुपये शिलकीचे अंदाजपत्रक त्यांनी मांडले. आर्थिक वर्षात १७३ कोटी ४९ लाख ६१ हजार ३२० रुपये पालिकेला उत्पन्न मिळाले. यातून १७३ कोटी ३६ लाख एक हजार रुपये खर्ची पडले. विशेष म्हणजे शहरवासियांवर कराचा कोणताही बोझा टाकण्यात आलेला नाही.
स्मशानभूमीच्या नुतनीकरणासाठी निधीची तरतूद
शहरात सद्यस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व उद्यानाच्या सुशोभिकरणासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टी आणि पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. याबरोबरच सुधारीत पाणी पुरवठा योजना व मलनिस्सारण योजनेचे काम सुरु असल्याचा उल्लेख आशालता चव्हाण यांनी आपल्या मनोगतात केला. रस्ते, गटार दुरुस्तीसह खरजईरोडस्थित स्मशानभूमीच्या नुतनीकरणासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. मध्यंतरी स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचा प्रश्न सोशल माध्यमावरही मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता.