अंबडमध्ये ईव्हीएम बंद, जेष्ठ मतदार ताटकळले; जालना जिल्ह्यात दुपारपर्यंत ३८ टक्के मतदान
By विजय मुंडे | Updated: December 2, 2025 16:05 IST2025-12-02T16:04:24+5:302025-12-02T16:05:12+5:30
जालना जिल्ह्यातील भोकरदन, परतूर, अंबड नगरपालिकांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे.

अंबडमध्ये ईव्हीएम बंद, जेष्ठ मतदार ताटकळले; जालना जिल्ह्यात दुपारपर्यंत ३८ टक्के मतदान
जालना:जालना जिल्ह्यातील भोकरदन, परतूर, अंबड या नगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत या तिन्ही ठिकाणी सरासरी ३८.२२ टक्के मतदान झाले आहे. अंबड नगरपालिकेसाठी सर्वाधिक ४१.४५ टक्के मतदान झाले. भोकरदन येथे ३९.८२ टक्के व परतूर मध्ये ३४.३५ टक्के मतदान झाले आहे.
जालना जिल्ह्यातील भोकरदन, परतूर, अंबड नगरपालिकांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीतील मित्र पक्षांना बाजूला ठेवून भाजपने तिन्ही पालिकांत स्वबळ आजमावले आहे. अंबड मध्ये महाविकास आघाडी एकत्र आली असून, इतर पक्षांनी स्थानिक पातळीवरील परिस्थितीनुसार आघाडी, युती करून निवडणूक लढविण्याला पसंती दिली आहे. निवडणुकीच्या प्रचार कालावधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांच्याही सभा झाल्या. जिल्ह्यातील तिन्ही शहरांमध्ये मंगळवारी सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळी ७:३० ते ११:३० या कालावधीत परतूरमध्ये २०.५० टक्के, अंबडमध्ये २४.६५टक्के तर भोकरदनमध्ये २४.४५% मतदान झाले होते. दुपारी दीड वाजेपर्यंत अंबड मध्ये ४१.५ टक्के, परतूरमध्ये ३४.३२ टक्के तर भोकरदनमध्ये ३९.८२ टक्के मतदान झाले आहे. एकूण ३१ हजार ९८३ मतदारांनी मतदान केले असून, त्यात १६ हजार १२५ पुरुष तर १५ हजार ८५८ महिला मतदारांचा समावेश आहे. दुपारपर्यंत झालेली मतदान प्रक्रिया जिल्ह्यात शांततेत पार पडली.
ईव्हीएम बंद, जेष्ठ नागरिक ताटकळले
अंबड शहरातील पंचायत समिती येथील मतदान केंद्र क्रमांक ११/०२ येथे मतदान यंत्र सुरुवातीला दोन मशीन बंद पडल्याने मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. सव्वा नऊ वाजता मतदान चालू झाले. यावेळी मतदारांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. साडेसात वाजल्यापासून ताटकळत उभे राहिल्याने ज्येष्ठ मतदारांची गैरसोय झाली.