राज्यातील अकरा पालिकांच्या निवडणुका होणार मे अखेर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 13:05 IST2026-03-03T13:05:40+5:302026-03-03T13:05:40+5:30
प्रभाग फेररचनेसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

राज्यातील अकरा पालिकांच्या निवडणुका होणार मे अखेर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सुधारित मतदारयाद्या प्राप्त झाल्यानंतरच राज्य निवडणूक आयोगाकडून नगरपालिका प्रभाग पुनर्रचनेचे काम हाती घेतले जाणार आहे. या कामासाठी सुमारे ४५ ते ६० दिवस लागतील. त्यामुळे अकरा पालिकांच्या निवडणुका मेअखेर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साखळी व फोंडा वगळता अकरा पालिकांच्या निवडणुका महापालिकेच्या निवडणुकीनंतर घ्याव्या लागणार आहेत. सर्वांचे लक्ष या निवडणुकांकडे लागून राहिले आहे.
पेडणे, डिचोली, वाळपई, कुंकळ्ळी, काणकोण, कुडचडें-काकोडा, केपें, म्हापसा, मडगांव, मुरगांव आणि सांगे या अकरा पालिकांच्या निवडणुका होणार आहेत. प्रभाग फेररचनेसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रभाग रचनेसाठी संबंधित तालुक्यांचे उपजिल्हाधिकारी यांची निवडणूक नोंदणी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर मामलेदारांना सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी म्हणून जबाबदारी दिली आहे. एकदा सुधारित मतदारयाद्या राज्य निवडणूक आयोगाच्या हातात पडल्यावर कामाला सुरवात होईल. प्रभाग पुनर्रचनेनंतर अधिसूचना जारी केली जाईल व त्यानंतर पालिका आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध होईल.
दरम्यान, महापालिकेची निवडणूक ११ मार्चला होणार आहे. साखळी आणि फोंडा नगरपालिकांचा कार्यकाळ अद्याप पूर्ण झालेला नसल्यामुळे या दोन्ही पालिकांची निवडणूक कालांतराने होणार आहे. काही पालिकांचा कार्यकाळ लवकर संपत असल्याने त्या ठिकाणी काही दिवस प्रशासक नेमले जाण्याचीही शक्यता आहे.
४५ ते ६० दिवस लागतील : मिनीन डिसोझा
राज्यातील नगरपालिका निवडणुकीबाबात राज्य निवडणूक आयुक्त मिनीन डिसोझा यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, 'मतदारयाद्यांचे विशेष सघन पुनरिक्षण झालेले असल्याने आम्ही सुधारित मतदारयाद्या मागितल्या आहेत. त्या मिळाल्यावर पालिकांमधील प्रभाग पुनर्रचनेच्या कामासाठी ४५ ते ६० दिवस लागतील. पुनर्रचना पूर्ण झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया होणार आहे. राज्य निवडणूक आयोगच प्रभाग पुनर्रचनेचे काम करणार आहे.