Vivek Agnihotri : सामाजिकदृष्ट्या ज्वलंत विषयांवर आधारित चित्रपट बनवणारे दिग्दर्शक म्हणून विवेक रंजन अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्याकडे पाहिलं जातं. त्यांच्या चित्रपटांनी कायमच चर्चेला वाव दिला असून ‘द काश्मीर फाइल्स’ हा त्यांचा असाच एक चित्रपट, जो केवळ ब्लॉकबस्टर ठरला नाही, तर अनेकांच्या मनाला भिडला आणि भारतीय जनतेला एका कटू सत्याशी समोरासमोर आणून ठेवले.
अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये विवेक अग्निहोत्रींनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या प्रभावाबद्दल आपले विचार मांडले. "तुम्ही एखाद्या काश्मिरी पंडिताला विचारून बघा, त्याला या चित्रपटातून काय मिळालं," असं म्हणत त्यांनी स्वतःच एक अनुभव शेअर केला. "तुम्ही गिरीजा देवीचा शेवटचा सीन पाहिला आहे? त्यांचं कुटुंब विशेषतः त्यांची बहीण मला एक ईमेल पाठवते. त्या म्हणाल्या, ‘गेल्या ३० वर्षांमध्ये आमच्या घरी कोणीही दीदीचं नाव घेत नव्हतं. पण तुमचा चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही पहिल्यांदाच झूम कॉलवर एकत्र आलो आणि संपूर्ण रात्र फक्त रडत होतो. त्यातून आम्हाला थोडा दिलासा मिळाला.'
विवेक अग्निहोत्री पुढे म्हणाले, "हा फक्त काश्मिरी पंडितांचाच नाही, तर संपूर्ण भारताचाही प्रश्न आहे. आधी जेव्हा काश्मीरचा उल्लेख यायचा, तेव्हा जगात ‘फ्री काश्मीर’सारख्या घोषणांचा गजर असायचा. पण या चित्रपटानंतर जगभरात लंडनच्या पार्लमेंटपासून ते जर्मनीपर्यंत भारताचा एक नवा दृष्टिकोन समोर आला. जनजागृती झाली. यासीन मलिकला आज तुरुंगात डांबण्यात आलं आहे, काश्मिरी पंडितांसाठी सरकारने ट्रिब्यूनल स्थापन केलं आहे. आज काश्मीरवर बोलणं ही गौरवाची बाब मानली जाते."
पुढे ते म्हणाले, "या चित्रपटाने सिद्ध केलं की, यशासाठी ना मोठे स्टार्स लागतात, ना चमचमता ग्लॅमर. फक्त सत्यात ताकद असावी लागते आणि ती ताकद लोकांच्या मनापर्यंत पोहोचतेच," असं विवेक अग्निहोत्री ठामपणे म्हणाले.
दरम्यान, विवेकअग्निहोत्री लवकरच ‘द बंगाल फाइल्स’ हा नवा चित्रपट घेऊन येत आहेत. या चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन त्यांनी स्वतः केलं आहे. तेज नारायण अग्रवाल आणि 'I Am Buddha Productions' प्रस्तुत हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.