सध्या राजकीय वर्तुळात ठाकरे बंधुंची चर्चा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्यात युती होईल की नाही यावर अद्याप संभ्रम आहे. दरम्यान नुकतंच उद्धव ठाकरेंनी सूचक वक्तव्य केलं. 'महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातलं लवकरच होईल' असं ते म्हणालेत त्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं आहे. अभिनेते मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure) यांनी गेल्या वर्षीच राज-उद्धव यांच्या एकत्र येण्यासंदर्भात भाष्य केलं होतं.
अभिनेते मकरंद अनासपुरेंचा 'राजकारण गेलं मिशीत' हा सिनेमा गेल्यावर्षी आला होता. तेव्हा त्यांनी 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर भाष्य केलं होतं. ते म्हणालेले की, "मराठी माणूस म्हणून मला केव्हाही आनंद होईल. मी एकदा राज ठाकरेंची मुलाखत घेतली होती. तेव्हा त्यांना विचारलं होतं की भावाची कधी आठवण येत नाही का त्रास होत नाही का. मला वाटतं की मराठी माणसांना एकत्र पाहिलं तर आपणही आनंदितच होऊ. माझीही हीच भावना असेल."
महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे घराण्याचं मोठं नाव आहे. बाळासाहेब ठाकरेंना मानणारे अनेक लोक आहेत. मुंबई म्हणजे बाळासाहेब ठाकरे असंच तेव्हा समीकरण होतं. बाळासाहेब यांचे पुत्र उद्धव आणि पुतण्या राज दोघंही राजकारणात आले. जेव्हा राज ठाकरे (Raj Thakre) शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. आज इतक्या वर्षांनीही राज आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं अशी अनेक मराठी माणसांची इच्छा असते. आता ती पूर्ण होते की नाही हे लवकरच कळेल.